First Session Of 18th Lok Sabha Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज देशाच्या संसदेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण झालं. या भाषणात राष्ट्रपतींनी देशाच्या विकासाचा, मोदी सरकारनं केलेल्या विकासकामांचा, राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्याचवेळी राष्ट्रपतींनी सीएए, कलम ३७०, नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा देशात स्थिर सरकार आल्याचं राष्ट्रपतींनी म्हणताच विरोधकांनी मात्र आरडा-ओरडा करत आक्षेप नोंदवला, तर सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून समर्थन दिलं.

नेमकं काय घडलं आज संसदेत?

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. त्यानंतर उपराष्ट्रपतींनीही इंग्रजीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील काही भाग वाचून दाखवला. या अभिभाषणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात एनडीएला मिळालेला विजय यावर भाष्य करण्यात आलं. “ही जगातली सर्वात मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ६४ कोटी लोकांनी आपलं कर्तव्य बजावलं आहे. महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला”, असं राष्ट्रपती भाषणात म्हणाल्या.

“या निवडणुकीचं सुखद चित्र जम्मू-काश्मीरमध्ये समोर आलं. तिथे मतदानाचे अनेक दशकांचे विक्रम मोडले आहेत. गेल्या ४ दशकांत काश्मीरमध्ये आपण बंद आणि संपामध्येच मतदानाचं चित्र पाहिलं होतं. भारताचे शत्रू या गोष्टीला जागतिक मंचावर जम्मू-काश्मीरचं मत म्हणून पसरवत राहिले. पण यावेळी काश्मीरमधून या दुष्प्रचाराला कडवं उत्तर देण्यात आलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच घरी जाऊन लोकांकडून मतदान करून घेतलं गेलं. मी लोकसभा निवडणुकीशी संबधित सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते”, असा उल्लेख राष्ट्रपतींनी केला.

“त्या असंवैधानिक ताकदींवर देशानं…”, १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं मोठं भाष्य; संसदेतील अभिभाषणात केला उल्लेख!

“देशात सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार”

“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आज पूर्ण जगात होत आहे. जगानं पाहिलं आहे की भारताच्या लोकांनी सलग तिसऱ्यांदा स्थिर आणि स्पष्ट बहुमताचं सरकार बनवलंय”, असं त्यांनी भाषणात नमूद केलं. त्यानंतर विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्याचवेळी सत्ताधारी बाकांवरून या विधानाला बाकं वाजवून समर्थन दिलं.

“सहा दशकांनंतर असं झालंय. भारतीय नागरिकांच्या अपेक्षा सर्वोच्च स्तरावर असताना लोकांनी माझ्या सरकारवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला आहे. भारताच्या लोकांना हा विश्वास आहे की त्यांच्या अपेक्षा फक्त हेच सरकार पूर्ण करू शकेल. त्यामुळे २०२४ ची निवडणूक ही नीती, नियत, निष्ठा आणि निर्णयांवर विश्वासाची निवडणूक ठरली आहे. नागरिकांनी मजबूत आणि निर्णायक सरकारवर विश्वास, सुशासन, स्थिरता व निरंतरतेवर विश्वास, प्रामाणिकपणा व कठोर परिश्रमांवर विश्वास, सुरक्षा आणि समृद्धीवर विश्वास, सरकारच्या गॅरंटी आणि अंमलबजावणीवर विश्वास, विकसित भारताच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे”, असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात सांगितलं आहे.

“माझ्या सरकारने १० वर्षांपासून केलेल्या सेवा आणि सुशासनाच्या मोहिमेवरचं हे शिक्कामोर्तब आहे. भारताला विकसित करण्याचं काम सातत्याने होत राहावं आणि भारतानं आपलं ध्येय गाठावं हे निश्चित करण्यासाठीचा हा जनादेश आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.