राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी येथे तीन तासांसाठी दाखल झालेल्या पंतप्रधानांना विविध स्तरांवरील निषेधांना सामोरे जावे लागले. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ तसेच पत्रकारांनी पंतप्रधानांचानिषेध केला. अनेक ज्वलंत प्रश्नांनी ग्रासलेल्या आसामसाठी पंतप्रधानांनी काहीच केले नसल्याचा सूर या सर्वानी लावला होता.
बांगला देशातून येथे येणारे घुसखोरांचे लोंढे, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, असुरक्षित सीमा, पूरग्रस्तांची फरफट आदी समस्यांच्या निवारणासाठी पंतप्रधानांनी काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षातर्फे मूक निदर्शने करण्यात आली. तोंडावर काळ्या पट्टय़ा लावलेले भाजपचे नेते व कार्यकर्ते यावेळी मोठय़ा प्रमाणावर जमले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही हीच भूमिका घेत धरणे धरले, तसेच पंतप्रधान ज्या मार्गावरुन गेले तेथे जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधानोतापर्यंत चार वेळा येथून खासदार म्हणून निवडून गेले, मात्र त्यांनी आसामसाठी काहीच केले नाही, अशी टीका हेमेन दास यांनी केली.
आसामच्या अनेक ज्वलंत समस्यांकडे पंतप्रधान डोळेझाक करत असल्याचा आरोप करत ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ या विद्यार्थी संघटनेनेही जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधानांचा निषेध केला. पंतप्रधानांना येथून उमेदवारी घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका या संघटनेच्या नेत्यांनी केली.
पंतप्रधानांच्या खासदारकीची मुदत १४ जून या दिवशी संपुष्टात येत आहे. आसाममधील दोन जागांसाठीच्या निवडणुकीची अधिसूचना सोमवारी काढण्यात आली. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २० मेपर्यंत असून ३० मे या दिवशी ही निवडणूक होणार आहे.
आसामप्रति कृतज्ञता..
पंतप्रधानांचे पारंपरिक बिहू नृत्याने स्वागत करण्यात आले. अर्ज भरल्यानंतर त्यांनी आसामप्रति कृतज्ञता व्यक्त केली. राज्यसभेत आसामचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला गेली २१ वर्षे मिळत आहे. यासाठी मी आसामचा व येथील नागरिकांचा आभारी असून हे ॠण न फिटणारे आहे, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister entered the rajya sabha candidate form