पीटीआय, नवी दिल्ली

संसदेमध्ये झालेली घुसखोरी हा गंभीर मुद्दा असून त्यावरून वादावादी व भांडणे करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. लोकसभेमध्ये बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर आक्रमक विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करत संसदेचे कामकाज रोखून धरले असताना पंतप्रधानांनी यावर प्रथमच जाहीर वक्तव्य केले आहे. 

एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, की या प्रकरणाची चौकशी सुरू असून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनेच्या मुळाशी जाऊन आणि यामागे असलेल्यांचे हेतू जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे प्रकरण ‘वेदनादायी आणि चिंताजनक’ असल्याचे ते म्हणाले. मनोरंजन डी आणि सागर शर्मा यांनी १३ डिसेंबरला लोकसभेमध्ये घुसखोरी करून पिवळा वायू सोडला होता. त्यांचे अन्य दोन साथीदार नीलमा देवी आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात पिवळा धूर सोडत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री निवडीबाबत पंतप्रधान म्हणाले, की या नेत्यांना भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत.

संसदेतील घुसखोरीच्या

घटनेवर उपाय शोधण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. अशा मुद्दय़ांवर भांडणे प्रत्येकाने टाळले पाहिजे. संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य कमी लेखू नये. लोकसभेचे अध्यक्ष संपूर्ण गांभीर्याने आवश्यक पावले उचलत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Story img Loader