पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय उत्पादनांना चालना देण्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाचे आता एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर झाले आहे. त्याचा प्रभाव कायम असून, भारताला आता कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘लिंक्डइन’वरील एका ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला यशस्वी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, की ‘प्रत्येकजण मेक इन इंडिया उपक्रमाचा प्रणेता, द्रष्टा आणि नवकल्पक आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच या मोहिमेच्या यशस्वीतेला चालना मिळाली. त्यामुळे भारताने जागतिक पातळीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले’, असे मोदी यांनी नमूद केले. ही सामूहिक मोहीम असून, अथक प्रयत्नांमुळे एका स्वप्नाचे आता शक्तिशाली चळवळीत रूपांतर झाले आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रभाव इतका झाला आहे की, भारताला आता कोणीच थांबवू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली

लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी यांचे परिपूर्ण मिश्रण असल्याने आज भारताला पुरक स्थिती आहे. व्यवसायासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील प्रमुख खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबी भारताकडे आहेत. परिस्थिती स्पष्टपणे भारताच्या बाजूने आहे. जागतिक साथीसारख्या अभूतपूर्व आव्हानांचा सामना करूनही, भारत विकासाच्या मार्गावर ठामपणे राहिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की ‘आज आपल्याकडे जागतिक विकासाचे चालक म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर मी माझ्या तरुण मित्रांना आवाहन करतो की, ‘मेक इन इंडिया’ला नव्या उंचीवर नेण्यासाठी सहभागी व्हा, आपण सर्वांनी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वितरण गुणवत्ता ही आपली वचनबद्धता असावी. तर शून्य दोष हा आपला मंत्र असला पाहिजे.’ ‘एकत्रितपणे, आपण अशा भारताची निर्मिती करू शकतो जो स्वत:च्याच नाही तर जागतिक गरजा पूर्ण करू शकेल. जगासाठी भारत एक उत्पादन आणि नावीन्यपूर्ण उर्जाकेंद्र म्हणून काम करेल,’ असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >>>CJI Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भर कार्यक्रमात गायलं आमिर खानच्या चित्रपटातील गाणं; पाहा VIDEO

गोरगरिबांच्या स्वप्नांना बळ’

भारताला निर्मिती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून भारत हा एक प्रतिभावान राष्ट्र म्हणून केवळ आयातदार नाही तर निर्यातदार म्हणूनही ओळखला जाईल. ही मोहीम विशेष या अर्थाने आहे की तिने गोरगरिबांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आकांक्षा बाळगण्यासाठी बळ दिले. यामुळे त्यांना विश्वास मिळाला. या मोहिमेमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोग (एमएसएमई) क्षेत्रावरील प्रभावही वाढला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

केंद्र सरकार ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला सर्व शक्य मार्गांनी प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. देशाची सुधारणात्मक वाटचाल यापुढेही सुरूच राहील. आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण करू – नरेंद्र मोदी, पंतप्रधान