पीटीआय, फुलबनी (ओडिशा) काँग्रेस लोकसभेच्या ५० जागाही जिंकू शकणार नाही, असा दावा ओडिशातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या निवडणुकीनंतर काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा मिळणार नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोदी यांनी आव्हान दिले. नवीनबाबू दीर्घकाळ ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ओडिशातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगावीत, असे आव्हानच पंतप्रधानांनी दिले. ओडिशाची ‘अस्मिता’ धोक्यात आहे आणि भाजप तिचे रक्षण करेल. तसेच भाजप पक्षाचे ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन केले जाईल. या राज्याची ओडिया भाषा आणि संस्कृती समजणाऱ्या मातीचा मुलगा किंवा मुलीला मुख्यमंत्री केले जाईल, असे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. तरीही इथले लोक त्यांच्यावर नाराज आहेत. ओडिशातील जिल्ह्यांची आणि त्यांच्या राजधान्यांची नावे माहीत नाहीत. त्यांना लोकांच्या वेदना कशा कळणार, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. ओडिशा राज्यात भरपूर नैसर्गिक संसाधने आहे. असे असूनही लोकांना गरीब ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्यांना सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. त्याचवेळी लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला १० टक्के जागा मिळवता येणार नाहीत. त्यांना ५० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावा मोदींनी केला. हेही वाचा >>>काँग्रेस ५० जागाही जिंकणे कठीण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. काँग्रेसचे ‘शहजादे’ २०१४ च्या निवडणुकीपासून तीच स्क्रिप्ट वाचत आहेत. एनडीए सर्व रेकॉर्ड मोडेल आणि ४०० हून अधिक जागा यावेळी जिंकेल, असा दावा मोदी यांनी केला. काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा अपमान : मोदी चत्रा : अयोध्येतील राम मंदिरातील भेटीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला त्यांच्या ‘शहजादा’च्या वयापेक्षा कमी जागा मिळतील, असा दावाही केला. झारखंडमधील चत्रा येथे निवडणूक प्रचारसभेत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीच इंडिया आघाडीतील नेते छोट्या पक्षांच्या विलीनीकरणाचा विचार करत आहेत. त्यावरून आधीच पराभव मान्य केल्याचे मोदी म्हणाले. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. या ठिकाणीही ‘एनडीए’ची सरकारे स्थापन होतील, असेही मोदींनी सांगितले.