नवी दिल्ली : ‘काँग्रेस संविधानविरोधी असून आणीबाणीत संविधानाला हरताळ फासणारे आता आम्हाला (भाजप) संविधानाच्या रक्षणाचे धडे देत आहेत. संविधान धोक्यात आल्याची खोटी कहाणी रचून काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे’, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत केला. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसीविरोधी असल्याचीही खरमरीत टीका मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चाला उत्तर देताना केली.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे गांधी कुटुंबाला कशासाठी वाचवत आहेत, असा प्रश्न मोदींनी केला. ‘काँग्रेस का खूश आहे हेच समजत नाही. लोकसभा निवडणुकीत पराभवाची हॅटट्रिक झाली म्हणून की, ‘नर्व्हस ९०’ला बळी पडले म्हणून की, त्यांच्या नेत्याचे लॉचिंग पुन्हा अयशस्वी झाले म्हणून? खरगे देखील खूश झालेले दिसले हे पाहून आश्चर्य वाटले. खरेतर काँग्रेसच्या पराभवाचे खापर अन्य कोणावर तरी फुटायला हवे होते पण, खरगे भिंत बनून मध्ये उभे राहिले आणि पराभव आपल्या खांद्यावर झेलला. पराभवाचे खापर फोडण्यासाठी दलित, ओबीसी नेत्याला उभे केले जाते आणि (गांधी) कुटुंबाला वाचवले जाते, अशी टीका मोदींनी केली.

हेही वाचा >>>‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

‘लोकसभाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’च्या उमेदवाराचा पराभव होणार हे दिसत असतानाही के. सुरेश या दलित नेत्याला काँग्रेसने उभे केले. २०१७ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दलित समाजातील मीराकुमारी यांना तर, २००२ मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंना उभे केले होते. काँग्रेस दलित-आदिवासी, ओबीसीविरोधी आहे. त्यांनी तत्कालीन दलित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा, पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला होता’, असा हल्लाबोल मोदींनी केला.

‘लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत संविधानाचा मुद्दा होता, आता पुन्हा संविधान रक्षणाचा मुद्दा कसा निर्माण होतो? आणीबाणीनंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीचा काँग्रेसला विसर पडला का? त्यावेळी आम्ही संविधानाच्या रक्षणाचा लढा दिला होता. त्यामुळे देशाचे संविधान जिवंत राहिले. संविधान रक्षणसाठी यावेळीही लोकांनी आम्हाला (एनडीए) निवडून दिले आहे. आमच्यावर विश्वास ठेवून जनमताने आम्हाला कौल दिला आहे’, असा दावा मोदींनी केला.

‘आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ ७ वर्षांचा होता. असा निर्णय राजकीय पक्ष कसा घेऊ शकतो? काँग्रेसने संविधानात दुरुस्त्या केल्या, संविधानाचा आत्मा नष्ट केला. काँग्रेसने पाप केले असून संविधान हा शब्द उच्चारणे काँग्रेसला शोभत नाही’, अशी चपराक मोदींनी दिली.

‘डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळे आमच्या सारख्या अनेक सामान्यांना पदे मिळू शकली, संसदेमध्ये येता आले. रालोआ सरकारसाठी संविधान फक्त अनुच्छेदांची जंत्री नव्हे, त्यातील प्रत्येक शब्द, त्याचा आत्मा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करतो’, असे मोदी म्हणाले.

मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका’

‘मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्याचे सर्वप्रयत्न केंद्र सरकार करत आहेत. त्यावरून राजकारण करू नका, नाहीतर तिथले लोक एकदिवस तुम्हाला नाकारतील’, असा इशारा पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात विरोधकांना दिला. ईशान्येकडील या राज्यामध्ये दीड वर्षांपूर्वी, ३ मे २०२३ मध्ये सुरू झालेला हिंसाचार अजूनही थांबलेली नाही. तरीही मोदींनी मणिपूरला भेट दिलेली नाही, असा आरोप करत ‘मणिपूरला न्याय द्या’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी लोकसभेत केली होती. त्या मुद्द्यावरून ‘इंडिया’ आघाडीतील सदस्यांनी मोदींच्या भाषणामध्ये अडथळे आणले होते.

सोनियांवरही टीका

अनेकांना वाटते की, भारताची अर्थव्यवस्था आपोआप विस्तारेल. त्यासाठी काहीच करण्याची गरज नाही. या लोकांना (काँग्रेस) खरेतर कष्ट करण्याची सवयच नाही. त्यांना सरकार रिमोट कंट्रोलने चालवले जाण्याची सवयच जडली होती. पण, आम्ही कष्ट करू, विकासाचा वेग वाढवू. असे म्हणत मोदींनी सोनिया गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली.

ईडी’‘सीबीआय’ला मोकळीक

भ्रष्टाचारविरोधी लढा हे ध्येय असून लाचखोरांना शिक्षा भोगावीच लागेल. म्हणूनच मी ‘ईडी’ व ‘सीबीआय’ला मोकळीक दिली आहे. या संस्थांनी प्रामाणिकपणे काम करावे, त्यांच्या कामामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे सांगताना ईडी व सीबीआयसारख्या यंत्रणाचा गैरवापर केल्याचा आरोप मोदींनी फेटाळला. काँग्रेसच्या काळात ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खाते या संस्थांचा राजकीय गैरवापर केला गेला. २०१३ मध्ये मुलायम सिंह यादव यांनीच, ‘या संस्था असताना काँग्रेसविरोधात लढणे सोपे नाही’, असे म्हटले होते. ‘माकप’चे माजी महासचिव प्रकाश कारात यांनी देखील, राजकीय विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसने सीबीआयचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तर सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट असे म्हटले होते, अशी उदाहरणे देत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.