नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप यशाची पुनरावृती करेल असा दावा केला. ‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून गोव्यामध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या चारही राज्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा,  गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या  नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी विजयोत्सव साजरा केला.  भाजपच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात मोदींनी  कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ‘’यावर्षी होळी १० मार्चला साजरी केली जाईल असे आश्वासन कार्यकर्त्यांनी मला प्रचारादरम्यान दिले होते, ते त्यांनी खरे केले आहे. त्यांच्या अपार कष्टामुळे भाजपला यश मिळाले’’, अशी प्रशंसा मोदींनी केली. ‘’उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत पण, एखाद्या मुख्यमंत्र्याला सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून देण्याची किमया ३७ वर्षांनी घडवली, त्याबद्दल मतदारांचे आभार मानतो’’, असेही मोदी म्हणाले. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने निव्वळ विजय मिळवला नाही तर मतांचा वाटाही ३९.७ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. उत्तर प्रदेशात फक्त जातीचे राजकारण केले जाते अशी टीका होत होती. मात्र, २०१४, २०१७, २०१९ आणि आता २०२२ मध्येही मतदारांनी विकासाच्या राजकारणाला मते दिली. उत्तर प्रदेशमध्ये जातीपातींचे राजकारण होत नसल्याचे सिद्ध झाले असल्याचा दावा मोदींनी केला.

युक्रेन-रशिया युद्धाची सर्वाना झळ

युक्रेन-रशिया युद्धाची झळ प्रत्येक देशाला सोसावी लागेल. कोळसा, वायू आणि खतांच्या आंतरराष्ट्रीय किमती जगभरात झपाटयाने वाढत आहेत. भारत सूर्यफूल तेलासारखे तेल आयात करतो, असे सांगत मोदींनी महाग होत असलेल्या आयातीचे संकट देशापुढे उभे असल्याची जाणीव करून दिली. हजारो भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले असताना देशाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा, या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी राबवलेल्या ‘’गंगा मोहिमे’’ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असा मोदींनी विरोधकांवर शाब्दिक प्रहार केला.

विधानसभा निकालानंतर भाजप मुख्यालयात  पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा व इतर नेत्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi uttar pradesh four states bjp historic victory central powers akp
Show comments