Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वडेरा या केरळच्या वायनाड या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. त्यांनी आपल्या प्रचार सभेत मदर तेरेसांचं उदाहरण दिलं आणि

प्रियांका गांधी यांनी मदर तेरेसांची काय आठवण सांगितली?

केरळच्या वायनाडमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या, “माझ्या वडिलांना (राजीव गांधी) ठार करण्यात आलं तेव्हा मदर तेरेसा आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी मला अशा पद्धतीने मिठी मारली ज्याप्रमाणे मी त्यांचीच मुलगी आहे. मी त्यांना सांगितलंही मदर तेरेसा तुमच्यात आणि माझ्या आईमध्ये काहीही फरक वाटत नाही. मला वायनाडची जनताही माझ्या आईप्रमाणेच वाटते आहे. असं म्हणत प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

आणखी काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) म्हणाल्या, “मला अजूनही तो प्रसंग आठवतो आहे. मी १९ वर्षांची होते. माझ्या वडिलांना ठार करण्यात आलं. त्या घटनेला सहा-सात महिनेच झाले होते. मदर तेरेसा घरी आल्या. त्यांनी माझ्या आईची (सोनिया गांधी) भेट घेतली. त्यावेळी मला ताप आला होता मी आजारी झाले होते. मदर तेरेसा माझ्या खोलीत आल्या, त्यांनी माझ्या डोक्यावरुन हात फिरवला. त्या मला म्हणाल्या होत्या की माझ्याबरोबर काम करण्यास सुरुवात कर. यानंतर जवळपास ५ वर्षांनी मी त्यांच्या सिस्टर्ससह काम करु लागले होते. मी लहान मुलांना शिकवत असे, त्यावेळी मी बाथरुम्सही स्वच्छ केली. मला अनाथांची दुःखं समजली. तसंच समाजाने या घटकांची मदत केली पाहिजे असंही मला वाटलं.” असं प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) म्हणाल्या. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?

प्रियांका गांधी राजकारणात

प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) या राजकारणात सक्रिय कधी होतील? साधारण २० वर्षांपासून ही बाब राजकारणात चर्चेत होती. मात्र आता पहिल्यांदाच प्रियांका गांधी राजकारणात उतरल्या आहेत. वायनाड या ठिकाणाहून त्या पोटनिवडणूक लढत आहेत. प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी तीन ते चार दिवसांपूर्वीच उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. २०१९ आणि २०२४ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी याच जागेवरुन विजयी झाले होते. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सेफ मानला जातो आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात त्यांची ओळख तयार केली आहे. सध्या ते लोकसभेचे विरोधी पक्षनेतेही आहेत.

राहुल गांधी प्रियांका गांधींबाबत काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या निधनानंतर प्रियांका गांधी यांनी कशाप्रकारे सोनिया गांधी यांना दु:खातून सावरले, याचा उल्लेख केला होता. राहुल गांधी म्हणाले, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या बहिणीने आईला दु:खातून सावरले. माझ्या आईने (सोनिया गांधी) सर्वस्व गमावले होते. बहिणीने (प्रियांका गांधी) सर्वस्व गमावले होते. पण बहिणीने आईला सावरले”. दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.