पुण्यातील कल्याणीनगर भागात मागील महिन्यात पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या जामिनाच्या निर्णयानंतर सर्वसामान्य जनता आणि पीडित तरूणांच्या कुटुंबिय संताप व्यक्त करत आहेत. जबलपूर येथे राहणाऱ्या अश्विनी कोस्टा या २४ वर्षीय तरुणीचाही या अपघातात मृत्यू झाला होता. अश्विनीची आई ममता कोस्टा यांनी न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.

माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या, “आम्हाला आरोपीच्या सुटकेची बातमी ऐकून धक्काच बसला. पण आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाने हा निर्णय घेताना काहीतरी विचार केला असेल. पण न्यायालयाने आमचेही दुःख लक्षात घ्यायला हवे होते. मी माझी मुलगी गमावली आहे. या प्रकरणात योग्य न्याय झाला तरच जनतेचाही न्यायालयावरील विश्वास कायम राहिल. महाराष्ट्र सरकारनेही आम्हाला न्याय मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.”

उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात ठेवण्यास विरोध केला असून हा निर्णय अवैध असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना ममता कोस्टा म्हणाल्या, “कायद्यात काय तरतूद आहे, याची मला कल्पना नाही. न्यायालयाने काहीतरी विचार करूनच निर्णय दिला असेल. फक्त आम्हाला न्याय मिळायला हवा. त्या शहरात अश्विनीसारख्या हजारो मुली शिक्षण घेतात आणि नोकरी करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे.”

१९ मे रोजी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने महागडी पोर्श कार बेदरकारपणे चालवून अश्विनी आणि अनीशच्या दुचाकीला धडक दिली होती. दोघेही मध्य प्रदेशचे रहिवाशी असून पुण्यात आयटी कंपनीत काम करत होते. या अपघातानंतर देशभरात हे प्रकरण गाजले होते.

दरम्यान एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील पीडित कुटुंबाने २४ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, या प्रकरणाच्या एकूण तपासाबाबत चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी पीडित परिवाराचे सांत्वनही केले. हा अपघात दुर्देवी असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच पीडित परिवाराला न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

ज्या मुलाकडून अपघात घडला त्याला अपघाताच्या रात्रीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी केली गेली. मात्र तिथून त्याला १५ तासांतच जामीन मिळाला. अपघात कसा घडला यावर ३०० शब्दांचा निबंध लिही हे सांगून जामीन मंजूर करण्यात आला होता. हा निर्णय समजल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजातून या मुलावर आणि ३०० शब्दांचा निबंध लिही सांगणाऱ्या न्यायाधीशांवर चांगलीच टीका झाली. तसेच गरीबाच्या मुलालाही इतके सहज सोडले गेले असते का? असे प्रश्न उपस्थित झाले. टीका झाल्यानंतर आरोपीची पुन्हा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. आज त्याला तिथूनही जामीन मिळाला.