लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या भाषणातील काही टिप्पण्ण्या लोकसभाध्यक्षांनी कामकाजाच्या इतिवृत्तातून काढून टाकल्या. त्यावर, काँग्रेसच्या खासदाराने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘मोदीजींच्या जगात सत्य खोडून काढले जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात सत्य काढून टाकता येत नाही. मला जे काही म्हणायचे होते ते मी बोललो आणि तेच सत्य आहे. ते त्यांना हवे तितके काढून टाकू शकतात, परंतु सत्याचा विजय होईल’’, असे मत राहुल गांधी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत बोलताना भाजपच्या धर्माधारित राजकारणावर टीका केली. भाजपच्या सदस्यांनी तसेच, अमित शहा यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची धर्मावर आधारित टिप्पणी इतिवृत्तातून काढून टाकण्याची मागणी केली होती. माफीची मागणी राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला होता. राहुल गांधींचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनवेळा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल गांधींच्या भाषणामध्ये अडथळ आणत वारंवार आक्षेप घेतले होते. राहुल गांधींनी खोटे आरोप केले असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.