Rahul Gandhi Share Market Profit: भारताच्या शेअर बाजारात फुगवटा आणला गेला आहे, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्र सरकारवर करतात. मात्र मागच्या पाच महिन्यात त्यांच्या स्वतःच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाल्याचे समोर आले आहे. आयएनएस (IANS) वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात शपथपत्रात माहिती दिली होती. यावेळी त्यांनी कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली, याचीही माहिती दिली होती. या शेअर्सच्या दरात मागच्या पाच महिन्यात घसघशीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

राहुल गांधी यांच्या शेअर बाजार पोर्टफोलियोची किंमत ४.३३ कोटींवरून (१५ मार्च २०२४) आता १२ ऑगस्ट २०२४ रोजी ४.८० कोटींवर पोहोचल्याचे आयएनएसच्या वृत्ताद्वारे समोर आले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिव्हिस लॅब्स, जीएमएम फॉडलर, हिंदुस्तान लिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टिसीएस, टायटन, ट्यूब इनव्हेस्टमेंट ऑफ इंडिया अशा काही कंपन्यांचे शेअर्स राहुल गांधी यांच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत.

हे वाचा >> Rahul Gandhi : शेअर मार्केटमध्ये रिस्क! “गुंतवणूकदारांनी पैसे गमावले तर…”, हिंडेनबर्ग प्रकरणावरून राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलियोमध्ये सध्या २४ स्टॉक्स आहेत. त्यापैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर त्यांना तोटा झाला आहे. याव्यतिरिक्त व्हर्टोझ ॲडव्हरटायझिंग लि. आणि विनाइल केमिकल्स या छोट्या कंपन्याही त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत.

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात शेअर बाजारात तेजी

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मागच्या काही महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनेक विक्रम मोडीत काढत विक्रमी उच्चांक गाठला आहे. दरम्यान हिंडेनबर्ग संस्थेने रविवारी सेबीच्या अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी संयुक्त संसदीय समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा >> राहुल गांधींची संपत्ती किती? म्युच्युअल फंड ते स्टॉक मार्केट गुंतवणूकीसह सर्व माहिती समोर

“सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच (Madhavi Buch) यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरले जाईल? पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच की गौतम अदानी? जे नवीन आणि अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) पुन्हा एकदा या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत चौकशी करेल का? आता हे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान मोदी जेपीसी (संसदीय संयुक्त समीती) तपासाला इतके का घाबरले आहेत? त्यातून काय उघड होऊ शकते”, असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.