गेल्या वर्षी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला. त्यानंतर राज्यात रेवंत रेड्डी यांचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात काँग्रेसने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं, जे आता रेवंत रेड्डी सरकारने पूर्ण केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी शेतकरी प्रश्नावर आज (२२ जुलै) सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणामधील शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, कर्जमाफीच्या घोषणेनंतर राहुल गांधी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आम्ही जे बोललो ते करून दाखवलं.” राहुल यांनी म्हटलं आहे की तेलंगणामधील शेतकरी कुटुंबांचं अभिनंदन, काँग्रेस सरकारने तुमचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. यासह ‘शेतकरी न्याय’ संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील ४० लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. आम्ही जे बोललो ते करून दाखवलं, हीच आमची नियत आणि सवय आहे.

राहुल यांनी म्हटलं आहे की काँग्रेस सरकार शेतकरी आणि मजुरांसह वंचितांच्या बळकटीकरणासाठी काम करणारा पक्ष आहे. शेतकरी, मजूर आणि वंचितांसाठी राज्याच्या तिजोरीतून पैसे खर्च होतील याची काँग्रेसकडून हमी दिली जाते. आजचा ऐतिहासिक निर्णय त्याचंच उत्तम उदाहरण आहे. जिथे-जिथे काँग्रेस सत्तेत असेल तिथे-तिथे हिंदुस्तानचं धन हिंदुस्तानी नागरिकांसाठी खर्च केलं जाईल.

हे ही वाचा >> “छगन भुजबळ दंगल घडवणार”, मनोज जरांगेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, “ते सरकारमध्ये बसून…”

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी कुटुंबांचं अभिनंदन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की काँग्रेस पक्षाने तेलंगणातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं वचन दिलं होतं. आम्ही ते वचन पूर्ण केलं आहे. तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारच्या या निर्णयामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील सर्व संपत्तीवर देशातील जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे हे पैसे केवळ जनतेवर खर्च व्हायला हवेत आणि हाच काँग्रेसचा मंत्र आहे. सरकारने नेहमी नागरिकांचं, शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचं हित जोपासलं पाहिजे. काँग्रेस सरकारने यापूर्वी राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचंही कर्ज माफ केलं होतं. केंद्रात आमचं सरकार असताना आम्ही देशभरातील शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं.