राहुल गांधी यांचे भाषण हा एक चांगला स्टँडअप कॉमेडीचा नमुना होता. त्यांनी हिंदूंच्या देवी-देवतांना काँग्रेसचं ब्रँड अँबॅसेडर बनवले. भगवान महादेवाने आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावला तो काँग्रेसचा हात असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. हा त्यांच्या भाषणाचा स्तर होता. त्यांच्या विधानांवर आम्ही हसत होतो. मुस्लीम बांधव नमाजसाठी हात पुढे करतात, तोही काँग्रेसचा हात आहे, असंही ते म्हणाले. ज्या ज्या देवता आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावतात त्यांना राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रचारक करून टाकले.

राहुल गांधी यांचा राजा साहेब असा उपहासाने उल्लेख करत कंगना रणौत म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलही तक्रार आहे. राजा साहेब जेव्हा येतात. तेव्हा पंतप्रधान उभे राहून त्यांना नमस्ते करत नाहीत. त्यामुळे राहुल गांधीकडून आपल्याला अधिक अपेक्षा नाही. त्यांचे संपूर्ण भाषण आक्षेपार्ह होते. हिंदू धर्मात देवाला देव्हाऱ्यात किंवा मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी ठेवलं जातं. पण राहुल गांधींनी देवांच्या तसबीरी सभागृहात आणून त्या बेंचखाली ठेवल्या. देवांच्या तसबीरी हवेत उंचावून दाखवत त्यांनी देवतांचा अवमान केला. तसेच हिंदू धर्मीय लोक हिंसक असतात असे अपमानजनक विधानही त्यांनी केले. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहीजे, अशी मागणी कंगना रणौत यांनी केली.

“मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान

राहुल गांधी यांच्या भाषणावर रामायणमधील कलाकार आणि भाजपाचे खासदार अरुण गोविल यांनीही आक्षेप व्यक्त केला. “राहुल गांधी यांनी अतिशय चुकीचे विधान केले असून त्यांनी ते करायला नको होते. मी हिंदू आहे आणि हे सांगताना मला गर्व वाटतो. राहुल गांधी यांनी सर्व हिंदूंची माफी मागायला हवी. राहुल गांधी यांनी नाटकीय पद्धतीने भाषण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तो अभिनय काही फार जमला नाही. त्यासाठी मुद्द्यांवर पकड असणे गरजेचे आहे. राहुल गांधी मोठे होत नाहीयेत, हे आजच्या भाषणातून दिसून आले”, अशी टीका अरुण गोविल यांनी केली.

कंगना रणौत आणि अरुण गोविल यांच्याप्रमाणेच बॉलिवूड अभिनेते आणि भाजपाचे खासदार रवि किशन यांनीही राहुल गांधींच्या भाषणावर टीका केली.

खासदार रवि किशन म्हणाले, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करायची होती, पण राहुल गांधी हिंदूंवर घसरले. भगवान शिवाची प्रतिमा ते उंचावत होते, मग टेबलावर आपटत होते. हे खूपच दुःखद होते. राहुल गांधींच्या आजच्या भाषणात परिपक्वता दिसली नाही. ते थट्टा-मस्करी करत होते. मी शिवभक्त आहे, या नात्याने मला आज खूप दुःख झाले.