संसदीय अधिवेशनात सोमवारपासून (१ जुलै) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा चालू आहे. दरम्यान, लोकसभेत सोमवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच ते म्हणाले, “भाजपा देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भाजपावाले हिंसा आणि द्वेष पसरवत आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत.” दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मध्येच हस्तक्षेप केला. ते म्हणाले, “संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणं अत्यंत गंभीर आहे.” त्यावर राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, भाजपा व आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही.”

राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून भाजपा नेते, एनडीएतील (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) त्यांचे मित्रपक्ष आणि त्या पक्षांचे नेते राहुल गांधींवर टीका करू लागले आहेत. अशातच हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतः दहशतवादी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, “हिंदूंना दहशतवादी म्हणणं योग्य नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मानतात आणि लोकांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य नाही. ते समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत त्यांनी संविधानावरून लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. भाजपावाले ४०० पार गेले तर ते संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशा पद्धतीचा प्रचार करून त्यांनी जनतेची दिशाभूल केली, त्यांनी निवडणुकीत जनतेला ब्लॅकमेल केलं, समाजात फूट पाडली. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत, आता ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम करू लागले आहेत. मला वाटतं राहुल गांधी यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मी त्या वक्तव्याचा विरोध करतो. तसेच मी म्हणेन की राहुल गांधींनी समाजात फूट पाडणं आता थांबवायला हवं.”

हे ही वाचा >> विधान भवनात देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, लिफ्टकडे इशारा करत म्हणाले…

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, “राहुल गांधी हिंदूंना दहशतवादी म्हणाले, भारतीय जनता पार्टीला दहशतवादी म्हणाले, परंतु राहुल गांधी हे स्वतः आणि त्यांचा काँग्रेस पक्ष दहशतवादी आहे. त्यांनी निवडणुकीत अशीच भूमिका ठेवून समाजांमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे.” यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आठवले यांना म्हणाले, तुम्ही खूप खळबळजनक वक्तव्य करत आहात, तुम्ही राहुल गांधींना दहशतवादी म्हणत आहात. त्यावर आठवले म्हणाले, “राहुल गांधी हिंदूंना दहशतवादी म्हणाले म्हणून तेदेखील दहशतवादी आहेत.”