Ratan Tata Death News Live Updates: भारतीय उद्योग विश्वात स्पर्धेबरोबरच सामाजिक जाणीव, आर्थिक फायद्याबरोबरच वंचितांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न, सहवेदना, परोपकारी वृत्ती, प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणारा माणूस या सगळ्या बाबींचं एक विलक्षण रसायन रतन टाटा यांच्यामध्ये तयार झालं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग विश्वाबरोबरच देशाच्या सामाजिक जाणीवेतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे.

Live Updates

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांचं निधन, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

13:23 (IST) 10 Oct 2024
Ratan Tata Death News Live Updates: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची रतन टाटांना श्रद्धांजली

रतन टाटा यांच्या निधनामुळे मला मनस्वी दु:ख झालं आहे. ते भारतीय उद्योग विश्वातले दिग्गज व्यक्तिमत्व होते. पण ते फक्त एक बिझनेस आयकॉनपेक्षा खूप काही होते. त्यांचा मानवतावादी दृष्टीकोन त्यांनी स्थापन केलेल्या व वाढवलेल्या अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून व्यक्त होतो. सत्तेतल्या लोकांना सत्य सांगण्याची धमक त्यांच्यात होती. त्यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर एकत्र काम करण्याच्या अनेक आठवणींचं संचित माझ्याकडे आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो – मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

12:30 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: रतन टाटांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकारला करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पार करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्या निधनावर मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावानंतर यावर चर्चा झाली व मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.

12:17 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त. सोशल मीडियावर सरसंघचालक मोहन भागवत यांचा संदेश केला शेअर

11:43 (IST) 10 Oct 2024
Ratan Tata Passes Away in Mumbai: …आणि रतन टाटांनी एका क्षणात ४५० कोटी रेल्वेला दिले!

लावण्याचा निर्णय घेतला होता. वायफाय लावण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत आम्हाला झाली होती. त्यातून प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली होती. मी रायपूरमध्ये एकदा रात्री पाहिलं होतं की लहान मुलं तिथे वायफायचा वापर करून अभ्यास करत होते. आम्हाला वाटलं देशभरात प्रत्येक स्टेशनवर वायफाय लावलं पाहिजे. साधारणपणे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर पुढील वर्षभरात त्यावर काम होतं. मी एकदा सहजच रतन टाटांना सांगितलं की वायफाय लावल्यामुळे फायदा झाला आणि आता सरकार देशभरातल्या सर्व स्टेशनवर वायफाय लावू इच्छित आहे. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता लगेच सांगितलं की टाटा सन्स यासाठी रेल्वेला पैसा देईल. त्यांचा काहीही संबंध नव्हता तसा. पण त्यांनी त्यांचे सचिव वेंकट यांना आदेश दिला. एका क्षणात त्यांनी ४५० कोटी रेल्वेला दिले. मला आठवतंय शेवटी शेवटी तो प्रकल्प संपेपर्यंत आम्हाला आणखी थोड्या निधीची आवश्यकता होती. एवढ्यासाठी टाटांना कसं विचारायचं? असा प्रश्न आम्हाला पडला होता. पण तेव्हा वेंकट म्हणाले की टाटांनी ही जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे रेल्वेला या प्रकल्पासाठी जो काही निधी लागेल, तो आम्ही देऊ – पियुष गोयल, माजी रेल्वेमंत्री

11:28 (IST) 10 Oct 2024
Ratan Tata Death News Live Updates: शरद पवार एनसीपीएमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपीएमध्ये घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन

11:14 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: सुधा मूर्ती यांची रतन टाटांना श्रद्धांजली!

आम्ही कधीच जमशेदजी टाटांना पाहिलं नाही. पण माझ्या आयुष्यात मी रतन टाटांसारखा दुसरा माणूस पाहिला नाही. रतन टाटांचं एक युग होतं आणि आता त्या युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. मी परोपकारी वृत्ती, सहवेदना या गोष्टी हाऊस ऑफ टाटामध्येच शिकले. रतन टाटांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहे – सुधा मूर्ती, राज्यसभा खासदार

10:52 (IST) 10 Oct 2024
Ratan Tata Passes Away in Mumbai: मुकेश अंबानींकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली, म्हणाले…

आज भारतासाठी एक दु:खद दिवस आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे फक्त टाटा ग्रुपचंच नुकसान झालं नसून प्रत्येक भारतीयाचं नुकसान झालं आहे. रतन टाटांच्या निधनामुळे भारतानं एक सर्वात सहृदयी मुलगा गमावला आहे. रतन टाटा यांनी भारताला जागतिक स्तरावर नेलं आणि जगातलं सर्वोत्तम भारतात आणलं. त्यांनी हाऊस ऑफ टाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. १९९१ साली ते टाटा ग्रुपचे चेअरमन झाल्यानंतर ७० पटींनी त्यांनी हा उद्योग मोठा केला – मुकेश अंबानी

10:41 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: राज ठाकरेंनी शेअर केला रतन टाटांचा ‘तो’ व्हिडीओ, पोस्टमध्ये म्हणाले…

नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात, आम्ही अनेक प्रकल्प सीएसआर निधीतून उभारले. आणि नाशिक सुंदर करावं म्हणून ज्या ज्या कल्पना मी देशातील नामवंत उद्योजकांसमोर मांडल्या, त्या प्रत्येकाने मला तात्काळ होकार दिला. नाशिकमध्ये एक बोटॅनिकल उद्यान सुरु करावं अशी माझी इच्छा होती, त्यासाठी मी रतन टाटांना सीएसआरमधून निधी द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. इतकंच नाही सुरुवातीला जो निधी मंजूर केला त्यापेक्षा अधिक निधी काम वाढतंय म्हणून लागणार आहे हे पाहून, तो निधी पण मंजूर केला. बोटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर मी रतन टाटांना विनंती केली तुम्ही स्वतः या उद्यानाला भेट दिलीत तर उत्तम होईल. खरंतर जागतिक पातळीवर काम करणारे उद्योगपती असं सहजासहजी कुठे जात नाहीत, पण रतन टाटा नाशिकला आले. त्यांनी आम्ही उभारलेलं उद्यान पाहिलं. आणि नंतर माध्यमांशी बोलताना, माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये कौतुक होतं, पण मला तो त्यांनी दिलेला आशीर्वाद वाटला. मी भाग्यवान आहे रतन टाटांसारख्या अनेक दिग्गजांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची ही चित्रफीत, जरूर पहा

10:40 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Death News Live Updates: रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट!

रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली. स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला. बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

10:39 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: वरळी स्मसानभूमीत होणार अंत्यसंस्कार

रतन टाटांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं.

10:27 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Passes Away in Mumbai: रतन टाटा यांचं पार्थिव एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं

रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ च्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार असून तोपर्यंत त्यांचं पार्थिव एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

10:26 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata Death News Live Updates: एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर

रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

10:22 (IST) 10 Oct 2024

Ratan Tata News Today: सचिन तेंडुलकरची रतन टाटांना श्रद्धांजली

सचिन तेंडुलकरनं रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यातून त्यानं टाटांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात आख्ख्या देशात बदल घडवला. त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळाला हे माझं नशीब होतं. पण लाखो लोकांना ही संधी मिळाली नाही. मला आज तेच दु:ख होतंय. एवढा त्यांचा प्रभाव होता. त्यांचं प्राण्यांबद्दलच प्रेम, परोपकारी वृत्ती यातून त्यांनी हे दाखवून दिलं की खरी प्रगती ही तुम्ही तेव्हाच साध्य करू शकता जेव्हा तुम्ही ज्यांच्याकडे स्वत:ची काळजी घेण्याइतकीही साधनं नाहीत, अशा लोकांची काळजी घेता.
रतन टाटा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही उभ्या केलेल्या संस्था आणि तुमच्या जीवनमूल्यांमधून तुमचा वारसा चिरकाल जिवंत राहील”, असं सचिननं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त