Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

रतन टाटा यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. तसेच रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी संपर्क साधून शोक व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भारत सरकारच्यावतीने रतन टाटा यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थने दिली आहे.

हेही वाचा : Ratan Tata : रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार, राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, “रतन टाटा एक दूरदर्शी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहिली

अमित शाह यांनी म्हटलं आहे की, “दिग्गज उद्योगपती आणि सच्चे राष्ट्रवादी रतन टाटा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी निस्वार्थपणे आपले जीवन समर्पित केले. प्रत्येक वेळी मी त्यांना भेटलो तेव्हा देशातील लोकांच्या भल्यासाठी त्यांचा आवेश आणि बांधिलकी मला आश्चर्यचकित करत असे. आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे लाखो स्वप्ने फुलली. रतन टाटा हे आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहतील”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आत रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.