राम मंदिरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींचे वक्तव्य राम मंदिराच्या निर्माणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे वाटते. पण २०१४ मध्ये देशातील जनतेने राम मंदिराच्या मुद्द्यावरुनच भाजपाला बहुमत दिले होते. सरकारने याच कार्यकाळात या आश्वासनाची पूर्तता करावी’, असे संघाने म्हटले आहे.
देशात सध्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असून संघ, विश्व हिंदू परिषद तसेच शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव निर्माण केला आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणीही केली जात आहे. अखेरीस यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
हमें आज का प्रधानमंत्री जी का वक्तव्य मंदिर निर्माण की दिशा में सकारात्मक कदम लगता है।प्रधानमंत्री ने अयोध्या में श्रीराम के भव्य मंदिर बनाने के संकल्प का अपने साक्षात्कार में पुनः स्मरण करना यह भाजपा के पालमपुर अधिवेशन(1989) में पारित प्रस्ताव के अनुरूप ही है।
— RSS (@RSSorg) January 1, 2019
मोदींच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मोदींचे विधान आम्हाला राम मंदिराच्या निर्माणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल वाटते. भाजपाने १९८९ मधील पालमपूर अधिवेशनात ही राम मंदिरासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ मध्ये जाहीरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. देशातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला बहुमताने निवडून आणले. आता सरकारने याच कार्यकाळात राम मंदिराचे आश्वासन पूर्ण करावे, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.