RSS Leader Sunil Ambekar on JP Nadda : “पूर्वी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती, मात्र आता भाजपा स्वयंपूर्ण झाली आहे”, असं वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपा आणि आरएसएसमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यावेळी संघ व भाजपाच्या काही लोकांनी यावर स्पष्टीकरण देऊन या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता यावर संघातील एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याला ‘फॅमिली मॅटर’ (कौटुंबिक वाद) म्हटलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी (भारताचे दिवंगत पंतप्रधान) यांचा कार्यकाळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणातील अस्तित्व कसं बदलत गेलं आहे? असा प्रश्न नड्डा यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी “भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो”, असं भाष्य केलं होतं. जे. पी. नड्डा म्हणाले होते की “सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. मात्र आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे”.

हे ही वाचा >> RSS व भाजपात समन्वयाच्या अडचणी, संघानं केलं मान्य; प्रसिद्धीप्रमुख म्हणाले, “हे फक्त व्यवस्थापनात्मक…”

सुनील आंबेकर नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये सुनील आंबेकर यांना नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. सुनील आंबेकर यांनी या वक्तव्याला फॅमिली मॅटर म्हटलं आहे. तसेच त्यांनी संघ व भाजपामधील दुफळीच्या अफवांचं खंडण केलं. ते म्हणाले, “आम्ही कौटुंबिक वाद कुटंबातच सोडवतो. सार्वजनिक मंचांवर अशा विषयांवर चर्चा करत नाही”.

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची शक्यता, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू

भाजपाला आता आरएसएसच्या पाठिंब्याची गरज नाही?

नड्डा यांच्या वक्तव्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की आता भाजपाला संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? त्यावर भाजपा अध्यक्ष म्हणाले, “पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्ये आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. तर, आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवं”.