S Jaishankar Critcized Rahul Gandhi at Geneva : इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जनतेच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. यावरून आता परराष्ट्र एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोपं नाही, इथे कठोर मेहनत करावी लागते, असं ते म्हणाले. जिनिव्हा येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले एस.जयशंकर?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. “काही लोक चीनमधून केलेल्या आयातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आपण चीनकडून इतकी आयात का करतो, असं विचारलं जातं. मात्र, १९६० ते १९९० च्या काळातील सरकारांनी कधीही उत्पादनाकडे लक्ष दिले नाही. आज जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो, तेव्हा आमच्याकडे संसाधने नाहीत त्यामुळे आम्ही उत्पादन क्षेत्राकडे वळू शकत नाही, असं सांगितलं जातं. मुळात जोपर्यंत उत्पादन क्षेत्र मजबूत होत नाही, तोपर्यंत तुम्ही जागतिक महासत्ता बनू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Amit Shah Targets Rahul Gandhi: “मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत…”, अमित शाह यांची लोकसभा विरोधी पक्षनेत्यांवर टीका; म्हणाले, “देशविरोधी…”

राहुल गांधींना लगावला टोला

पुढे बोलताना, त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनाही टोला लगावला. “देशाचा विकास करण्यासाठी योग्य त्या धोरणांची आवश्यकता असते. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे कठोर परिश्रम करावे लागतात”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशातील गरीब परिवारातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास, हे पैसे खटाखट महिलांच्या खात्यात जमा होतील, असं ते म्हणाले होते. त्यावेळी या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदींसह इतर भाजपाच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S jaishankar critcized rahul gandhi at geneva life is not khata khat spb