S Jaishankar on Pakistan Occupied Kashmir : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (२८ सप्टेंबर) पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानबरोबरचा पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आपल्याला सोडवायचा आहे. त्यांना पाकव्याप्त काश्मीर रिकामं करायला लावण्याचा मुद्दा अद्याप बाकी आहे. सीमेपलीकडे पाकिस्तान दहशतवादी धोरणं राबवत आहे, मात्र ते त्यात कधीच यशस्वी होणार नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील. आजही ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत”. जयशंकर यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या म्हणजेच यूएनजीएच्या ७९ व्या सत्राला संबोधित केलं.

एस जयशंकर म्हणाले, “भारत व पाकिस्तानमधील केवळ एकच मुद्दा सोडवणं बाकी आहे. तो म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीरमध्ये बळकावलेला काश्मीरचा भाग त्यांना रिकामा करायला लावायचा आहे. तो भारताचा भूभाग आहे. तसेच सीमेपलीकडून भारताविरोधात होत असलेल्या दहशतवादी कारवायांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे”.

हे ही वाचा >> Who is Bhavika Mangalanandan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावणाऱ्या भाविका मंगलानंदन कोण आहेत? संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं केलं प्रतिनिधित्व

“पाकिस्तानने जाणूनबुजून काही चुका केल्या”

भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, “पाकिस्तान त्यांच्या कर्माची फळं भोगतोय. त्यांचं ‘कर्म’ आज त्यांच्याच समाजाला गिळंकृत करत आहे. काही देश त्यांच्या नियंत्रणात नसलेल्या शक्तींमुळे किंवा परिस्थितीमुळे मागे राहिले आहेत. परंतु, काही देश असेही आहेत जे स्वतःच्या चुकांमुळे मागे राहिले. ज्यांनी जाणूनबुजून असे निर्णय घेतले की जे त्यांच्या देशासाठी घातक ठरले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आमचा शेजारी देश पाकिस्तान”.

हे ही वाचा >> Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक रोखेसंदर्भात गुन्हा दाखल!

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील : जयशंकर

एस. जयशंकर म्हणाले, “आम्ही काल याच मंचावरून काही चुकीच्या गोष्टी ऐकल्या. त्यामुळे मला भारताची भूमिका स्पष्ट करायची आहे. सीमेपलीकडील दहशतवादाचे पाकिस्तानचे धोरण कधीच यशस्वी होणार नाही. याची त्यांना शिक्षा मिळेल. ते त्या शिक्षेपासून स्वतःचा बचाव करू शकणार नाहीत. त्यांच्या कृतीचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील.

हे ही वाचा >> सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल

“आता फक्त एकच मुद्दा सोडवणं बाकी”

भारत आणि पाकिस्तानमध्ये आता केवळ एकच मुद्दा सोडवणं बाकी आहे. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे भारताची जमीन बळकावली आहे. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग त्यांनी मोकळा करावा. दहशतवाद आणि त्यांच्या संघटनांबरोबरचे संबंध संपुष्टात आणावेत. दहशतवाद हा जगातील कोणत्याही समाजाच्या, धर्मांच्या शिकवणीच्या विरोधात आहे”.