दक्षिण भारतीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांना त्यांच्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांची या पदावर नियुक्त केली आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी परिपत्रत जारी करत याबाबत माहिती दिली.

काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी जारी केलेल्या परिपत्रकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे, असं म्हटलं आहे.

हेही वाचा – राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “विरोधी पक्षनेता हे फक्त पद नाही, मी तुमचा…”

भाजपाची काँग्रेसवर टीका

या निर्णयानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मध्यमवर्गीयांना त्रास देणारा परत आला असून काँग्रेसने देशवासियांचा विश्वासघात केला. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीनंतर सॅम पित्रोदा यांना पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं आहे, अशी टीका भाजपाचे नेते अमित मालविय यांनी केली आहे.

दक्षिण भारतीयांबाबत केलं होतं वादग्रस्त विधान

सॅम पित्रोदा यांनी द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीबाबत बोलताना, भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान केलं होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, पश्चिमेकडची लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखी आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी

पित्रोदा यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी या विधानावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “विरोधकांकडून जेव्हा मला शिवीगाळ केली जाते, तेव्हा ती मी सहन करू शकतो. परंतू माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होत नाही. आज त्वचेच्या रंगावरून आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. तसेच “आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. मला पित्रादा यांच्या विधानाचा खूप राग आला आहे. आज जे लोक संविधानाचं रक्षण करण्याच्या गोष्टी करतात, तेच लोक आज त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली होती.

महत्त्वाचे म्हणजे या विधानानंतर काँग्रेस पक्षाने पित्रोदा यांच्या विधानापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. पित्रोदांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. तसेच ते काही आमचे प्रवक्तेदेखील नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.