अमूक तमूक झालं तर, मी माझं नाव बदलून टाकेन किंवा तसं झालं तर मी अमूक तमूक करेन, अशी राणाभीमदेवी थाटात वल्गना करणारे नेते आपण राजकारणात अनेकदा पाहिले असतील. निवडणूक आली की, राजकीय पुढारी एकमेकांना असे आव्हान देत असतात. काही जण पराभूत होतात तर काही जणांना यश लाभते. मात्र दिलेल्या आव्हानावर अतिशय कमी लोक कायम राहतात. अनेकजण त्यातून पळवाटच शोधतात. मात्र आंध्रप्रदेशमधील एका नेत्याने स्वतःचे आव्हान पाळले आहे. आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण यांनी शपथ घेतल्यानंतर वायएसआर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने स्वतःचे नाव बदलले आहे.

प्रकरण काय आहे?

आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने मोठा विजय मिळवत जगनमोहन रेड्डी यांचे सरकार उलथवून लावले. आंध्रचे माजी मंत्री वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी निवडणुकीपूर्वी जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना आव्हान दिले होते. पवन कल्याण पिथापुरम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. “पवन कल्याण यांचा विजय झाला तर मी माझे नाव बदलून टाकेन”, असे आव्हान मुद्रगदा पद्मनाभम यांनी दिले होते.

आंध्र प्रदेशातील ५०० कोटींच्या पॅलेसची चर्चा! वादाच्या भोवऱ्यात का अडकलाय ‘राजमहाल’?

निकालानंतर पवन कल्याण यांचा मोठा विजय झाला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर आता मुद्रगदा पद्मनाभम यांनी स्वतःचे नाव बदलून फक्त “पद्मनाभम रेड्डी” असे ठेवले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर नाव बदलण्यासाठी कुणीही दबाव टाकला नव्हता. मी स्वतःच्या मर्जीने नाव बदलले.” तसेच त्यांनी ट्रेलिंग करणाऱ्यांवरही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पवन कल्याण यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय असभ्य भाषेत माझ्यावर टीका केली. मला हे अयोग्य वाटते. माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याऐवजी तुम्ही माझ्या कुटुंबालाच का नाही संपवून टाकत.”

कोण आहेत मुद्रगदा पद्मनाभम?

मुद्रगदा हे आंध्रप्रदेशमधील कापू समुदायाचे मोठे नेते आहेत. कापू समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आंध्रचे माजी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

कालचा जामीन आज स्थगित, अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर २४ तासांत विरजण!

आंध्रप्रदेशमध्ये जगनमोहन यांना धक्का

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी आघाडी केली होती. आंध्रप्रदेशमध्ये दोन्ही निवडणुका एकत्रच झाल्या. विधानसभेच्या १७५ जागांपैकी तब्बल १६४ जागी आघाडीचा विजय झाला. तर लोकसभेच्या २५ पैकी २१ जागा दोघांनी जिंकल्या. विधानसभेत टीडीपीला १३५, जनसेना पक्षाला २१ आणि भाजपाल ८ जागांवर विजय मिळाला. तर जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले. चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.