Sharad Pawar : साहित्य संमेलनात झालेल्या एका मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी एक भाष्य केलं त्या म्हणाल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचं. यावरुन चांगलाच वाद झाला. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना किती मर्सिडिज दिल्या ते त्यांनाच विचारा असं म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकरणावर माजी कृषी मंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीलम गोऱ्हे यांनी ते वक्तव्य करायची गरज नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हेंनी काय भाष्य केलं होतं?

“कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. याबाबत शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार नीलम गोऱ्हे यांच्याबाबत काय म्हणाले?

नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य साहित्य संमेलनात केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव लक्षात करायला त्यांनी ते भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं. यासंबंधी संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. संमेलनाचे जे आयोजक आहेत त्यांनीही नापसंती व्यक्त केली आहे. त्या सगळ्यावर आता पडदा टाकायला हरकत नाही.

पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली त्यामुळे मी म्हणतो आहे की पडदा टाका-पवार

साहित्य संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. त्यामुळे मी म्हटलं की पडदा टाका. संजय राऊत यांना माझ्यावरही जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही कारण मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. माझी संजय राऊत यांच्याबाबत काही तक्रार नाही. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader