काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी बिलावल भुट्टोंच्या बेताल वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बिलावल भुट्टो यांनी उगाच चिथावणी देणाऱ्या पोस्ट किंवा वक्तव्यं करु नयेत. पाकिस्तानने काही केलं तर आम्ही गप्प बसणार नाही. तसंच जर रक्ताचे पाट वाहिले तर पाकिस्तान्यांच्या रक्ताचा जास्त वाटा त्यात असेल हे कुणी विसरु नये असं म्हणत शशी थरुर यांनी बिलावल भुट्टोंना ठणकावलं आहे.
बिलावल भुट्टोंनी काय म्हटलं होतं?
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सिंधू करार रद्द करण्याबाबतचा आहे. यानंतर बिलावल भुट्टोंनी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की भारताने सिंधु करार रद्द करुन पाणी रोखलं तर या नदीतून पाणी नाही तर रक्ताचे पाट वाहतील. भारतीयांचं रक्त या नदीतून वाहिल अशी चिथावणीखोर प्रतिक्रिया बिलावल भुट्टोंनी दिली होती. ज्यानंतर अशा पोस्ट करु नका. रक्ताचे पाट वाहिले तर पाकिस्तान्यांचं रक्त त्यात अधिक असेल असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शशी थरुर?
भारताने अजून तरी पाकिस्तानचं नुकसान मोठ्या प्रमाणावर करावं असं ठरवलेलं नाही. पण पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाहीत तर आम्हीही प्रतिक्रिया देऊ. शिवाय रक्ताचे पाट वाहण्याच्या गोष्टी जे बिलावल भुट्टो करत आहेत त्यांना सांगू इच्छितो सिंधु नदीतून भारतीयांचं रक्त वाहिलं तरीही त्यात पाकिस्तान्यांचं रक्त मोठ्या प्रमाणावर वाहिल हे लक्षात ठेवा. पाकिस्तानला हे लक्षात ठेवावं लागेल की ते भारतीयांना ठार करु शकत नाही. भारताकडे अणु बॉम्ब तयार आहे. पण नो फर्स्ट यूज हे आमचं धोरण आहे हे लक्षात ठेवा असंही शशी थरुर यांनी बिलावल भुट्टोंना सुनावलं आहे.
पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसणारा देश आहे हे जगाला माहीत आहे-थरुर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाची ही भावना आहे की पाकिस्तानच्या विरोधात जोरदार कारवाई केली जावी. पाकिस्तान दहशतवाद्यांना कसं पोसतो आहे, ट्रेनिंग देतो ते सगळ्या जगाला माहीत आहे. दहशतवाद्यांना तयार करण्याचा पाकिस्तानचा पॅटर्न आहे. तरुणांची माथी भडकवली जातात, त्यांना चिथावणी दिली जाते आणि मग हातात हत्यारं देऊन त्यांचं ट्रेनिंग दिलं जातं. असं सगळं करुनही पाकिस्तान जबाबदारी झटकतो, मग परदेशातल्या एजन्सींकडून सत्य समोर येतं हे आजवर अनेकदा घडलं आहे असंही शशी थरुर यांनी ANI शी झालेल्या चर्चेत म्हटलं आहे.