पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरफी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार घटनादुरुस्ती मंजूर करण्याकरता जबरदस्तीचे डावपेच आखत असल्याचा आरोप पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. तसंच, संसदेत सदस्यांचा छळ होत असल्याचाही आरोप केला जातो. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नॅशनल असेंब्लीच्या अनेक कोषागार सदस्यांनी आणि सिनेटर्सने देखील विरोधी पक्षाच्या आरोपांचं समर्थन केलं आहे. बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे प्रमुख अख्तर मेंगल यांच्यावर लॉजवर छापा टाकला आहे. तसंच, नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान तरहीक-ए-इन्साफचे उमर अयुब खान यांनी दावा केला की विरोधी पक्षाच्या खासदारांना सरकारकडून एक अब्ज रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे.

हेही वाचा >> PM Modi visit Lahore: ‘जेव्हा पंतप्रधान मोदी अचानक धडकले होते पाकिस्तानात’, नवाझ शरीफ यांनी त्या भेटीचा संदर्भ आज का दिला?

“ही लाजिरवाणी बाब नाही का? इथे लोकशाही विकली गेली आहे का?” नॅशनल असेंब्लीमध्ये सुधारणांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्याने असा प्रश्न केला. संविधान बदलासाठी मसुदा मांडण्यापूर्वीच सभागृहात चर्चेला सुरुवात झाली. इम्रान खान यांच्या पक्षांच्या सदस्यांनी शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी बळजबरी डावपेच वापरत असल्याचा आरोप केला. २६ व्या घटनादुरुस्तीला संसदेत मांडण्यापूर्वीच समर्थन दिले जात आहे, असंही जिओ न्यूजने वृत्त दिलंय. तसंच, पाकिस्तान पीपल्स पार्टीवर घटनात्मक न्यायालय स्थापन करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही केला आहे.

कुटुंबियांना त्रास, तर मुलं बेपत्ता

घटनादुरुस्ती मंजूर करून घेण्याकरता सरकारकडे संख्याबळ नाही. आपला पाठिंबा मिळवण्याकरता पीटीआय नेते आणि कुटुंबियांना त्रास दिला जात आहे, असं पक्षाचे नेते झैन कुरेशी यांनी सांगितलं. त्यांच्या पत्नीला घरातूनच अटक करण्यात आली आहे. तसंच, इस्लामाबादला जात असताना मिकदाद अली बेपत्ता झाला तर रियाझ फत्याना यांचा मुलगाही दोनदा गायब झाला होता. विरोधी पक्षनेते उमर अय्युब यांनी सरकारवर खासदारांना जबरदस्तीने बेपत्ता केल्याचा आरोप केला आहे. घटनादुरुस्तीसाठी संख्याबळ अपुरे असल्याने त्यांचं अपहरण केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.

विधेयक मंजूर करण्याची घाई का झाली असा प्रश्नही काही खासदारांनी विचारला आहे. जे घडले ते लज्जास्पद आहे. त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. भूतकाळातही नाही आणि आताही नाही, असं पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे सिनेटर अली जफर यांनी नमूद केलं.