Bangladesh BNP on Sheikh Hasina in India: बांगलादेशमधील घडामोडी आणि शेख हसीना यांनी भारतात घेतलेला आश्रय या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेशमधील जनतेनं केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्या भारतात आल्या असून इथून पुढे लंडनला जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्यामुळे बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी अर्थात BNP नं आक्रमक भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशमध्ये काय घडलं?

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये गेल्या महिन्याभरापासून युवकांनी रस्त्यावर उतरून विरोध करायला सुरुवात केली. मात्र, शेख हसीना सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून परिस्थिती आणखी चिघळली. अखेर काही दिवसांपूर्वी आंदोलन हिंसक झालं आणि शेख हसीना सरकारनं देशभरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. तरीही आंदोलकांनी ढाक्यापर्यंत मोर्चा काढला. परिस्थिती चिघळू लागल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रदानपदाचा राजीनामा दिला व बांगलादेश सोडला.

मोहम्मद युनूस बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख ( फोटो – द इंडियन एक्सप्रेस )

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी अंतरिम सरकारची घोषणा केली. त्यानुसार नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद यूनूस यांच्याकडे अंतरिम सरकारची सूत्र सोपवण्यात आली. त्याबरोबर काही काळापासून अटकेत असणाऱ्या बीएनपीच्या अध्यक्षा खलिदा झिया यांची सुटका करण्यात आली. मात्र, आता झिया यांच्या पक्षाकडून शेख हसीना यांना भारतात आश्रय देण्यावर तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे.

“बांगलादेशची नाराजी स्वाभाविक”

बीएनपीचे ज्येष्ठ नेते खंदाकेर मुशर्रफ हुसेन यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. “शेख हसीना यांनी भारतात घेतलेल्या आश्रयावर बांगलादेशमधून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत. कारण लोकांना न आवडणाऱ्या व्यक्तींना मदत करणारेही लोकांना आवडत नाहीत”, असं ते म्हणाले.

Khaleda Zia: शेख हसीनांना आश्रय दिल्यामुळे खलिदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा; “तर कठीण होईल…”

“जर मला तुम्ही आवडत नाहीत आणि कुणीतरी दुसरी व्यक्ती तुम्हाला मदत करत असेल तर मला साहजिकच ती व्यक्तीही आवडणार नाही. त्यामुळे बांगलादेशमधील या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत. पण दुसऱ्या बाजूला भारत व बांगलादेशमध्ये नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. मग ते शेख हसीना यांचं सरकार असो की आवामी लीगचं सरकार असो”, अशी प्रतिक्रिया मुशर्रफ हुसेन यांनी दिली.

“बांगलादेशसाठी भारताशी चांगले संबंध महत्त्वाचे’

“भारताशी चांगले संबंध ठेवणं हे बांगलादेशच्या हितासाठी महत्त्वाचं आहे. जर भारताऐवजी दुसरा कुठला देश असता, तर मी हे म्हणालो नसतो. पण भारत एक मोठा देश आहे आणि जगातली एक मोठी अर्थव्यवस्था आहे. चांगल्या द्विपक्षीय संबंधांसाठी दोन्ही देशांनी एकत्र बसून या मुद्द्यांवर तोडगा काढायला हवा”, असंही त्यांनी नमूद केलं.

“शेख हसीना बांगलादेशमध्ये मोस्ट वाँटेड”

दरम्यान, दुसरीकडे बीएनपी पक्षाचे प्रवक्ते अमिर खसरू मेहमूद चौधरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आत्ताच्या घडीला शेख हसीना या बांगलादेशमधील मोस्ट वाँटेड व्यक्ती आहेत. अनेक गुन्ह्यांसाठी त्यांची चौकशी होणं बाकी आहे. यात हत्या, लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे बांगलादेशच्या नागरिकांना असं वाटतं की भारत सरकारनं त्यांच्या भावनांचा विचार करावा. शेवटी दोन देशांमधील संबंध म्हणजे तिथल्या नागरिकांमधले संबंध असतात”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheikh hasina in india bangladesh nationalist party angry khaleda zia pmw
Show comments