दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला, असं शिवसेनेनं शिवसेनेतील फूटनाट्याच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना म्हटलंय. शिवसेनेचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं जे फुटीर आमदार आहेत त्यांच्यापैकी अनेकांचे गोत्र हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच असल्याचा टोला लगावला आहे. तसेच, असं असलं तरी भाजपाने अनेक राज्यांमध्ये सत्तेसाठी तडोजीडी केल्या असून तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदही न देणारी भाजपा आणि शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी पायघड्या घालत असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच
“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या ‘युती’त होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला,” अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.

जनतेशी व महाराष्ट्राशी प्रतारणा करत आहोत ही जळजळ
“मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसांनी वेढून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे? जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात फिरण्याची गरज नाही; पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार आहे आपण शिवसेनेशी, जनतेशी व महाराष्ट्राशी प्रतारणा करत आहोत ही जळजळ त्यांना अस्वस्थ करीत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: सर्वोच्च न्यायालयातील अपात्रतेसंदर्भातील याचिकेच्या सुनावणीबद्दल CM शिंदे म्हणतात, “लोकशाहीमध्ये…”

भाजपामध्ये आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाह्य जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा
“ज्या बारा खासदारांनी आता स्वतंत्र गट स्थापन केला ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले व लोकसभेत पोहोचले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण वेगळा गट स्थापन करीत आहोत या त्यांच्या बतावणीस अर्थ नाही. प्रत्येकाचे एक स्वतंत्र, व्यक्तिगत व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाचे प्रकरण आहे. त्यातूनच हे पलायन घडले. हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, धैर्यशील माने असे खासदार ‘हिंदुत्व’ वगैरे मुद्द्यांवर बोलतात ते आश्चर्यच आहे. त्यांचे मूळ व कूळ शिवसेनेचे किंवा हिंदुत्वाचे नव्हतेच. शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले. नाहीतर यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच आहे हे काय कुणाला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षातही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाह्य जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे. भाजपाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड हे अनेक पक्षांचा प्रवास करीत भाजपात पोहोचले. केंद्रीय मंत्रिमंडळातील निम्मे सदस्य हे मूळच्या हिंदुत्ववादी गोत्राचे नसून काँग्रेस किंवा अन्य जातकुळीतले आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्रातील कोणत्या निष्ठावंतांचा बळी जातोय तेच पाहायचे
“अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आज मूळ भाजपाचे नाहीत, पण एखादे राज्य ताब्यात ठेवण्यासाठी, जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षातून आलेल्या लोकांनाही भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले. केंद्रात पदे दिली. महाराष्ट्रात तरी वेगळे काय घडले? शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडाच, पण उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी दिले नाही. पण शिवसेना फोडून बाहेर पडलेल्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पायघड्याच घातल्या आहेत. आता म्हणे खासदारांच्या ‘१२’च्या गटासही मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाणार. आता ही बक्षिसी म्हणजे शिवसेनेच्या वाट्यास नेहमीच आलेले अवजड उद्योग खाते असेल की आणखी कोणते असेल, ते कळेलच. आता या फुटीर गटाच्या मंत्रिमंडळ भरतीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या निष्ठावंतांचा बळी जातोय तेच पाहायचे,” असंही लेखात म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाही हे यांना सांगायचे कोणी?
“एकंदरीत देशात कायद्याचे व संविधानाचे राज्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी महापुराचे, प्रलयाचे थैमान सुरू आहे. माणसे, गुरेढोरे, घरेदारे वाहून गेली आहेत. डोंगर, दरडी कोसळत आहेत. पण फुटीर गटाचे मुख्यमंत्री दिल्लीत राजकीय शक्तिप्रदर्शनात गुंग आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले आहे. महाराष्ट्रात दरडी कोसळल्याने वाहतूक, जनजीवन ठप्प झाले आहे, पण राज्यात सरकारचे अस्तित्व नाही. सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाही हे यांना सांगायचे कोणी? इंदूर-अमळनेर एसटीस भीषण अपघात घडून त्यात अनेक जीव प्राणास मुकले, पण राज्याला पंधरा दिवसांनंतरही परिवहन मंत्री नाही. त्यामुळे मृतांचे नातेवाईक व जखमींचे अश्रू हे बेसहाराच बनले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे पूरपरिस्थितीची पाहणी करताना दिसत आहेत, पण त्यांचेही चित्त दिल्लीलाच लागून राहिले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “…म्हणून मी दिल्लीला आलोय”; मध्यरात्री दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत
“महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी त्या संकटात ‘बये दार उघड’ अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो लवकरच पेटून उठेल,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticize cm eknath shinde and group as 12 of 19 shiv sena mps join shinde faction scsg
Show comments