मणिपूर हे राजकीयदृष्या फायद्याचे राज्य नसल्याने पंतप्रधान मोदी तेथील घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत हाच त्यामागचा सरळसोट अर्थ. मागील काही काळात ‘ताश्कंद फाइल्स’, महिलांचे केरळमधील धर्मांतर, त्यांचा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतील सहभाग यावर ‘दी केरला स्टोरी’, कश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर ‘दी कश्मीर फाइल्स’ असे चित्रपट मधल्या काळात एका अजेंड्याप्रमाणे निर्माण केले गेले. या मंडळींनी आता मणिपूरमधील हिंसाचारावरही ‘मणिपूर फाइल्स’ असा चित्रपट काढावा. ‘केरला स्टोरी’चे ‘पब्लिक शो’ लावणारे भाजपवाले ‘मणिपूर फाइल्स’चे असेच सार्वजनिक शो लावण्याची हिंमत दाखवतील का? पंतप्रधान ‘मणिपूर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्याचे धाडस दाखवतील का?, असा सवाल शिवसेनेने ( ठाकरे गट ) उपस्थित केला आहे. "मणिपूर हिंसाचाराची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली नसती तर त्या गंभीर विषयावर पंतप्रधान मोदी यांनीही तोंड उघडले नसते. संवेदनशील मनाचा थरकाप उडविणाऱ्या एका व्हिडीओने पंतप्रधानांना मणिपूर हिंसाचारावरील ‘मौनभंग’ करण्यास भाग पाडले. अर्थात, ते जे थोडेफारच बोलले तेदेखील नेहमीप्रमाणे मूळ मुद्दा भरकटविणारे होते. अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही असे पंतप्रधान म्हणाले. आता माफ करणार नाही म्हणजे काय? भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, ये मोदी की गॅरंटी है, असे ते म्हणाले व दुसऱ्याच दिवशी अनेक तालेवार भ्रष्टाचारी त्यांनी भाजपात सामील करून त्यांना मंत्री वगैरे बनवले. त्यामुळे पंतप्रधानांचे बोलणे किती गांभीर्याने घ्यायचे?" अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. "२६ राजकीय पक्षांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्या इंडियाचे हे नग्न चित्र आहे. म्हणून ‘इंडिया’ वाचविण्यासाठी सगळळ्यांनी एकत्र व्हायला हवे. एका बाजूला कंगना राणावत ही अभिनेत्री केंद्र सरकारच्या विशेष सुरक्षा व्यवस्थेत ऐटीत वावरताना दिसते, तर त्याच वेळेला मणिपुरात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड भररस्त्यावर काढली जाते. त्या महिलांना कोणाचेही संरक्षण नाही. मोदींचा भारत हा असा आहे. सरकारच्या टाळकुट्यांच्या संरक्षणासाठी उद्या भारतीय जवानही पुरवले जातील, पण ज्यांना खरेच संरक्षण द्यायचे त्यांना वाऱ्यावर सोडले जाते," असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. "मणिपुरात बिगर भाजपशासित सरकार असते तर एव्हाना ते बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लावले असते. महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखे सरकार नव्हते म्हणून खोक्यांच्या मदतीने ‘ठाकरे सरकार’ पाडले. पण महिलांची नग्न धिंड उघड्या डोळ्याने सहन करणारे मुख्यमंत्री वीरेन सिंह आजही मणिपूरच्या सिंहासनावर विराजमान आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी महागाईचे खापर मुसलमानांवर फोडले, पण ते मणिपूरच्या हिंसाचाराचे खापर त्यांच्या सरकारवर फोडायला तयार नाहीत. कारण मणिपुरातील हिंसाचारात मुसलमान कोठेच नाही. त्यामुळे मोदी, हेमंत बिस्व सर्मा व समस्त भाजपा परिवाराची गोची झाली आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.