४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत एनडीएला बरोबर घेऊन ३०० चा टप्पाही ओलांडता आलेला नाही. एकट्या भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेली भाजपाची पडझड यामुळे यावेळचा निकाल भाजपाला अनपेक्षित असा लागला. असं असलं तरीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठीचं बहुमत आपल्याकडे आहे आणि आम्ही देशात एनडीएची सत्ता पुन्हा आणणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मात्र सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदींची तिसरी कसम म्हणजे भाजपाच्या अंकाचा चौथा अंक ठरेल, पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहतो आहे असं अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरुन खाली खेचलं आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं. याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भाजपाला सरकार बनवण्याइतकं बहुमतही मिळालेलं नाही. २४० वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसतो आहे. तरीही मोदींनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. लोकसभा निकालांनी मोदींना जमिनीवर आणलं आहे. मोदींनी सांगितलं की माझ्या आईच्या मृत्यूनंतर ही पहिली निवडणूक आहे. या निमित्ताने त्यांनी मान्य केलं की ते आकाशाती झग्यातून पडले नाहीत तर त्यांचा जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणेच आईचा कुशीतून झाला आहे. मोदींना हे असं बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांचा देवत्वाचा, अवतारगिरीचा आणि बाबागिरीचा मुखवटा जनतेने ओरबाडून काढला आहे. मोदी हे त्यांच्या ब्रांडचे म्हणजेच मोदी ब्रँडचे सरकार बनवणार नसून एनडीएचे सरकार बनवणार आहेत. मोदी सरकार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, मोदी तो भगवान है अशा फेकू कल्पनांना निकालांनी केराची टोपली दाखवली आहे. मोदींनी हे सरकार बनवलं तर त्यांचं चित्र हे व्यंगचित्र असेल.

PM Narendra Modi Oath Ceremony: “मै नरेंद्र दामोदरदास मोदी!…”, ८ जूनला पार पडणार शपथविधी सोहळा?

नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या कुबड्या घेऊन..

संपूर्ण शरीरभर फ्रॅक्चर आणि प्लॅस्टर लोपलेले मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील का याची गॅरंटी नाही. मोदींच्या भाजपाला २४० जागा मिळाल्याचं सांगितलं जातं. या संख्येतही घोळ आहे. एनडीए म्हणून २९२ जागा दाखवल्या जात आहेत ज्या फसव्या आहेत. तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदींनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला आहे. तरीही तो कागद आणि त्यावरची बहुमताची संख्या म्हणजे त्यांच्या एम. ए. इन एन्टाय पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल. मोदींकडे स्वतःचं बहुमत नाही व कुबड्यांवरचं बहुमत मोदींच्या बाणेदार स्वभावाला मानवणारे नाही. त्यामुळेच भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदींना सत्तेवरुन खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. उगाच रेंगाळू नका आणि स्वतःची बेअब्रू करुन घेऊ नका, पण सभ्यता आणि संस्कृती या शब्दांशी मोदी आणि अमित शाह या महाशयांचा संबंध आला नसावा. त्यामुळेच मोदी सरकार नाही एनडीए सरकार स्थापन होत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

मोदींना राम पावला नाही

मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण प्रभू श्रीराम अहंकाराचा शत्रू आहे, अहंकाराचा पराभव करुन रामाने अयोध्येचं रामराज्य स्थापन केलं. भाजपाला मिळालेल्या २४० जागा हा मोदी ब्रँडचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपाने ही संख्या गाठली आहे. मोदींनी महाराष्ट्रात १८ सभा आणि अनेक रोड शो केले. १८ पैकी १४ जागांवर भाजपाचा पराभव झाला. मोदी नागपुरात गेले नाहीत. तिथे भाजपाचे नितीन गडकरी विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचा आरोप होता की महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपाचा भ्रम लोकांनी तोडला. उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादीचे आठ खासदार विजयी झाले. मोदी मोदी करणाऱ्या भाजपाच्या खासदारांची संख्या २३ वरुन ९ वर आली. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहे त्या मोदींशिवाय असा उल्लेख करत सामनातून टीका करण्यात आली आहे.