पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एका वर्षाहून अधिक काळ बसून होते, परंतु आता पंतप्रधानांना केवळ १५ मिनिटं थांबावं लागलं तर त्यांना त्रास होऊ लागला. ” असे सिद्धू म्हणाले आहेत. याचबरोबर, हा दुटप्पीपणा का? असा सवाल देखील सिद्धू यांनी केला आहे.

दाना मंडी बर्नाला येथे जाहीर सभेला संबोधित करताना सिद्धू यांनी आरोप केला की, “मोदीजी, तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांच्याकडे जे होतं तेही तुम्ही काढून घेतलं.”

मोठी बातमी! आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

“ … असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला होते?” ; राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “ केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होते.” असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

“… आम्हाला वाटलं ते आम्हाला फसवत आहेत” ; पंजाबच्या घटनेवर शेतकरी नेते सुरजित सिंग यांचं मोठं विधान

तर, भारतीय किसान युनियन (क्रांतीकारी) प्रमुख सुरजित सिंग फूल यांनी म्हटले आहे की, “फिरोजपूरच्या एसएसपी यांनी आम्हाला हे सांगून रस्ता मोकळा करण्यास सांगितले की, पंतप्रधान या रस्त्याने रॅलीच्या ठिकाणी जात आहेत. आम्हाला वाटलं की, आम्हाला फसवून भाजपा नेत्यांच्या बसेस तिथून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या मार्गाने पंतप्रधान येत आहेत हे आम्हाला खरेच माहीत नव्हते. रस्त्यावर बरीच वाहने होती.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhu targets modi over punjab incident msr