Smriti Irani : भाजपाच्या नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांचे राजकारण आता बदललं असून ते आता बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी चक्क राहुल गांधी यांचं कौतुक केल्याने आता राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

स्मृती इराणी यांनी नुकताच एका पॉडकास्ट चॅनेलला मुलाखात दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या सध्याच्या राजकारणाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi on PM Narendra Modi: “माझी पंतप्रधान मोदींबाबत अडचण ही आहे की…”, राहुल गांधींनी सांगितली दोन कारणं; म्हणाले…

नेमकं काय म्हणाल्या स्मृती इराणी?

“राहुल गांधी यांच्या राजकारणात आता बदल झाला आहे. ते बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात. ते संसदेत येताना पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घालतात, याद्वारे तरुण पिढीला आपण काय संदेश देतो आहे, हे त्यांना माहिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ते विचारपूर्वक करतात. बोलतानाही ते खूप सांभाळून बोलतात”, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली.

पुढे बोलताना, “राहुल गांधी यांचे राजकारण तुम्हाला आवडत असले किंवा नसेलही किंवा तुम्हाला ते बालिशपणा वाटत असेल, पण आता ते वेगळ्या प्रकारचं राजकारण करत आहेत, हे आपण मान्य करायला हवं. त्यांना आता यश मिळू लागलं आहे”, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मिस इंडिया स्पर्धेबाबत एक विधान केलं होतं. या स्पर्धेतीलविजेत्यांमध्ये दलित महिला नसल्याचे ते म्हणाले होते. या विधानाबाबत विचारलं असता, “ज्या विधानांमुळे वाद निर्माण होईल,अशी विधानं राहुल गांधी जाणीवपूर्वक करतात. माध्यमांमध्ये राहण्यासाठी ते असं करतात. मुळात अशा विधानांचा सरकारशी काहीही संबंध नाही, हे राहुल गांधी यांनाही माहिती आहे. पण तरीही त्यांनी ते विधानं केलं. कारण अशा विधानामुळे ते सतत चर्चेत राहतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Rocky Mittal : “नफरत फैलाई हमने, मुझे माफ करना राहुल मेरे भाई”, गायक रॉकी मित्तल यांचा भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

स्मृती इराणी यांनी २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदार संघातून पराभव केला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक लढवावी लागली होती. या दरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीकाही केली होती. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या पराभवाचा बदला घेतला. त्यांनी अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांनी उमेदवारी दिली आणि शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता.