सापाने चावा घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो, हे आपण ऐकलं असेल. पण माणसाने चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू व्हावा, हे खरं वाटणार नाही. पण बिहारमध्ये अशी एक घटना घडली आहे. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील राजौली येथे एका रेल्वे कर्मचारी असलेल्या युवकाचा सापाने चावा घेतला. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तरुणानेही त्या सापाचा दोन वेळा चावा घेतला. त्यानंतर सापाचा मृत्यू झाला. ही बातमी पसरल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, संतोष लोहार (३५) असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजौलीच्या जंगल परिसरात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम सुरु असून संतोषही या कामासाठी इथे आला होता. मंगळवारी (२ जुलै) रात्री जेवण करून तो झोपला असताना सापाने त्याचा चावा घेतला. साप चावल्यामुळे जागा झालेला संतोषने सापाला पकडून त्याचा दोनदा चावा घेतला. असं केल्याने आपल्या शरीरातील विष पुन्हा सापाच्या शरीरात जाऊ शकते, अशी त्याची धारणा होती. सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर संतोष लोहारने रुग्णालय गाठून उपचार घेतले.

झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल

ग्रामीण भागात असलेल्या गैरसमजूतीमधून संतोषने हे कृत्य केल्याचे समोर आले. साप आपल्याला चावल्यास त्याचा पुन्हा चावा घेतल्याने विष उतरते, अशी गैरसमजूत अनेक ठिकाणी प्रचलित आहे. संतोष लोहारने सापाचा चावा घेतल्यानंतर लगेचच आपल्या सहकाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी त्याला राजौलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार डॉ. सतीश चंद्रा सिन्हा यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडले.

डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही रुग्णावर उपचार करून त्याला बरे केले आहे. मात्र त्याला कोणत्या प्रकारचा साप चावला हे कळू शकलेले नाही.

माणसांच्या चुका अन् प्राण्यांना शिक्षा! अन्न समजून सापाने गिळली प्लास्टिकची बाटली; असे वाचले प्राण, पाहा video

वन्य प्राणी आणि मानव हा संघर्ष नवा नाही. भारतात सर्पदंशामुळे दरवर्षी अंदाजे ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. तर सर्पदंश होणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये आहे.