लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी महिनादेखील उरला नसताना प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे काँग्रेस आर्थिक अडचणीत आली असून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला जाणीवपूर्वक आर्थिक पंगू करत आहेत’, असा गंभीर आरोप गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

सोनिया गांधींच्या आरोपांची राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी री ओढली. ‘पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही काँग्रेसची आर्थिक गळचेपी करत असून त्यांनी काँग्रेसविरोधात फौजदारी कारवाई केली आहे’, अशी टीका राहुल गांधींनी केली. तर ‘आर्थिक कोंडी करून काँग्रेसने लोकसभेची निवडणूक लढवू नये यासाठी षडय़ंत्र केले गेले आहे’, असा आक्रमक प्रहार खरगे यांनी केला.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”

लोकसभा निवडणुकीच्या काळात एखाद्या राजकीय पक्षाची बँक खाती जबरदस्तीने गोठवली जात आहेत, जनतेकडून गोळा केलेल्या पैशांच्या वापरावर बंदीहुकूम आणला जात आहे. हा प्रश्न अत्यंत गंभीर असून फमूलभूत लोकशाही व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नोटीस

 काँग्रेसच नव्हे तर भाजपही प्राप्तिकर भरत नाही. मग काँग्रेसविरोधात का कारवाई केली? ३१ वर्षांपूर्वी १९९३-९४ मधील तत्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळातील करांच्या प्रकरणांमध्ये काँग्रेसला आठवडय़ापूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे, असे काँग्रेसचे खजिनदार व महासचिव अजय माकन यांनी सांगितले.

हेही वाचा >>>लॉटरी किंग सांतियागो मार्टिनने भाजपापेक्षाही सर्वाधिक देणगी ‘या’ पक्षाला दिली

देशात लोकशाही असल्याचा दावा खोटा- राहुल गांधी

देशात लोकशाही असल्याचा मोदींचा दावा खोटा आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. मोदी-शहांनी महिनाभरापूर्वी काँग्रेसची आर्थिक ओळख पुसून टाकली. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसचे पैसे परत केले तरी महिनाभर वाया गेला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसकडे पैसेच नाहीत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून देशभर २० टक्के मते मिळतात आणि आम्ही २ रुपयेदेखील खर्च करू शकत नाही, अशी टीका राहुल यांनी केली.

पराभव अटळ असल्याने बहाणेबाजी- भाजप

लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे काँग्रेसला डोळय़ासमोर दिसत असल्याने काँग्रेस कोणती ना कोणती पळवाट शोधत आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचे कारण देत अन्याय होत असल्याचा देखावा उभा केला जात असल्याचा टोमणा भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी मारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi allegation regarding the action taken by the income tax department amy