उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत ८७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. तसेच दोन पुरुषांसह तीन चिमुकल्यांचादेखील यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील रतिभापूर गावात ही घटना घडली. या गावात आज साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जवळपास १५०० नागरीक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगीदेखील दिली होती. दरम्यान, सत्संग सुरू चेंगराचेंगरीची घटना घडली. यात जवळपास ८७ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – मंदिराची तोडफोड करण्याचा मुस्लिम व्यक्तीवर आरोप; पण दर्ग्यात दडलं होतं सत्य, समोर आली…

यासंदर्भात बोलताना, आम्ही आतापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र आता या रुग्णालयाची रुग्णांना दाखल करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे आम्ही खासगी रुग्णालयांना रुग्णांना दाखल करून घेण्यास सांगितलं आहे, अशी माहिती हाथरसचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेशकुमार त्रिपाठी यांनी दिली. तसेच ही घटना नेमकी कशी घडली? यासंदर्भात तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या ठिकाणी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

पुढे बोलताना, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह हे दोघेही घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करणयात आल्याचेही त्यांनी सांगितले.