कोटा (राजस्थान) :या वर्षभरात आत्महत्या केलेल्या अशा विद्यार्थ्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे. नीट, जेईईच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या एकूण आत्महत्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. मूळचा लातूरचा असलेल्या आविष्कार संभाजी कासले (१७) याने जवाहरनगरमधील कोचिंग सेंटरच्या सहाव्या मजल्यावरून दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास उडी मारली.
हेही वाचा >>> भरवर्गात वर्गमित्रांकडून मारहाण झालेला मुलगा तणावात, झोपही लागत नसल्याची वडिलांची तक्रार
या घटनेनंतर चार तासांनी, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आदर्श राज या १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांने तो राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील सदनिकेत गळफास घेतला, असे पोलिसांनी सांगितले. त्याची बहीण आणि चुलत भाऊ पोहोचल्यावर त्यांनी घरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. गळफास घेतलेल्या अवस्थेत छताला लटकत असलेल्या राज याला खाली उतरवल्यानंतर त्याचा श्वासोच्छास सुरू होता, पण रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कुंधाडीचे मंडल अधिकारी के. एस. राठोड यांनी दिली.
हेही वाचा >>> डिसेंबरमध्येच निवडणुका? भाजपाच्या हेलीकॉप्टर्स बुकिंगचा दाखला देत ममता बॅनर्जींचा दावा
गळफास घेतलेला राज हा बिहारच्या रोहतस जिल्ह्याचा रहिवासी होता. तो एक वर्षांपासून कोटय़ात नीट यूजीची तयारी करीत होता. तो आपली बहीण आणि चुलत भावासोबत २ बीएचके सदनिकेत भाडय़ाने राहत होता. ते दोघेसुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही घटनांत आत्महत्येआधी लिहिलेली चिठी, संदेश मिळून आलेला नाही. गतवर्षी कोटा येथे खासगी शिकवणी केंद्रांच्या १५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तेथे देशभरातून आलेले तीन लाख विद्यार्थी परीक्षांची तयारी करतात.
‘शिकवणी वर्गासाठी काढलेल्या कर्जाचा ताण’
जयपूर : कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत राजस्थानचे आरोग्य आणि अभियांत्रिकी मंत्री महेश जोशी यांनी चिंता व्यक्त केली असून, पालकांनी शिकवणी वर्गासाठी काढलेल्या मोठय़ा कर्जाचा ताण हेसुद्धा या आत्महत्यांमागचे एक कारण असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे केंद्राने धोरणात्मक निर्णय घेऊन पालकांना कर्ज काढावे लागू नये, असा उपाय योजावा, अशी मागणी त्यांनी केली.