बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगवास, १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा आणि आता मुख्यमंत्रिपद.. आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा असा राजकीय प्रवास झाला आहे. वडिलांप्रमाणेच पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधत चंद्राबाबू नायडू यांचा दारुण पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन हे पुत्र. २००९ मध्ये आंध्रमध्ये राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला पुन्हा संधी मिळवून दिली होती. दुर्दैवाने हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हे पटले नाही. जगनमोहन यांना कोणतेही पद देण्यास काँग्रेसने टाळले. जगनमोहन यांची आई सोनियांच्या भेटीसाठी गेली असता त्यांना भेट नाकारण्यात आली. ‘सोनिया आपल्या पुत्राला पंतप्रधानपद मिळावे म्हणून प्रयत्न करतात, मग मी माझ्या मुलाला मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून प्रयत्न केल्यास काय बिघडले,’ असा सवाल जगनच्या आईने केला होता. त्यांचे हे विधान तेव्हा चांगलेच गाजले होते.

काँग्रेस नेतृत्वाकडून खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. २००४ आणि २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळण्यात आंध्रचे तत्कातील मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी आंध्रमधून मिळवून दिलेले खासदारांचे संख्याबळ कारणीभूत ठरले होते. पण काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जगनमोहन यांच्या विरोधात काँग्रेसने मग साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला.  पुढे त्यांना अटक करण्यात आली. पुढे १६ महिने जगनमोहन यांना तुरंगात राहावे लागले. तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंगच त्यांनी बांधला होता.

जगनमोहन यांचा पक्षबांधणीवर भर

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांनी चांगली लढत दिली. पण भाजपशी हातमिळवणी केलेल्या चंद्राबाबू नायडू यांना सत्ता मिळाली. गेली पाच वर्षे जगनमोहन सतत लोकांचे प्रश्न हातात घेऊन लढत राहिले. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा म्हणून सतत हा मुद्दा चर्चेत ठेवला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘प्रजा संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. २००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जगनमोहन यांचे वडील राजशेखर रेड्डी यांनी अशीच पदयात्रा काढली होती.

नव्या सरकारचा गुरुवारी शपथविधी

विजयवाडा,आंध्र प्रदेश : युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस (वायएसआरसी) पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यपाल नरसिंहन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. तत्पूर्वी विजयवाडा  येथील बैठकीत वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली. वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत.  जगनमोहन रेड्डी यांचा शपथविधी ३० मे रोजी विजयवाडा येथे इंदिरा गांधी महापालिका स्टेडियमवर होणार आहे.

मोदींना भेटणार

जगनमोहन रेड्डी हे उद्या (रविवारी) पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, तसे आश्वासन त्यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. रविवारी सकाळी ते राजधानीत येतील व नंतर दुपारी पंतप्रधानांची भेट घेतील. त्यानंतर आंध्र भवनातील अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. मोदी सरकारला मुद्दय़ांवर आधारित पाठिंबा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story jaganmohan reddy
Show comments