Sudha Murty Troll : राज्यसभेच्या खासदार, प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका तथा इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनानिमित्त एक ऐतिहासिक कथा व्हिडिओद्वारे काल पोस्ट केली होती. परंतु, या व्हिडिओवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. अखेर यासंंदर्भात त्यांनी खुलासा केला आहे.

सुधा मूर्ती व्हिडिओमध्ये काय म्हणाल्या होत्या?

“माझ्यासाठी रक्षाबंधन आणि राखी हा महत्त्वाचा सण आहे. बहीण साधा राखा आपल्या भावाला बांधते. बहिणीच्या कठीण काळात भावाने तिला मदत करावी या भावनेप्रती ही राखी बांधली जाते. भाऊ-बहीण फार महत्त्वाचे असतात. राणी कर्णावती अडचणीत होती. तिच्या लहानश्या राज्यावर कोणीतरी हल्ला केला होता. तिला कळत नव्हतं काय करावं. त्यामुळे तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायुला एक साधा धागा पाठवला. मी अडचणीत आहे, मला तुमची बहीण समजा आणि येथे येऊन माझं संरक्षण करा. हुमायूला कळत नव्हतं की हे काय आहे. तो इतर देशातील असल्याने त्याला या धाग्याचा अर्थ कळला नाही. त्यामुळे त्याने स्थानिकांना विचारलं. ते म्हणाले की बहीणीने भावाला बोलावल्याची ही सूचना आहे. त्यामुळे राणी कर्णावतीला वाचवणं त्याला त्याचं कर्तव्य वाटलं. तो लागलीच निघाला. दिल्ली सोडून तो तिच्या राज्यात गेला. पण त्याला थोडा उशीर झाला. त्यावेळी विमानं नव्हती. वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जाई. पण त्याने तिथे गेल्यावर पाहिलं की ती मृत झाली होती. ही राखीची कल्पना म्हणजे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करायला येणे आहे. आताही ही परंपरा केवळ उत्तर भारतात नव्हे तर भारताच्या प्रत्येक कोपळ्यात पाळली जाते आणि बहीण आपल्या भावासाठी कितीही अंतर पार करून राखी बांधायला येऊ शकते.”

सुधा मूर्ती ट्रोल का झाल्या?

हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी या घटनेनंतर देशभर रक्षाबंधन साजरा करायला सुरुवात केली असं कॅप्शनमध्ये लिहिलंं आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं गेलं. ही कथा चुकीची असल्याचंही काही नेटिझन्सने म्हटलं. एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ डिलिट करून लोकांना चुकीचा संदेश देणं थांबवा अशीही सूचना काही नेटिझन्सने केली.

हेही वाचा >> Raksha Bandhan 2024:राखीच्या परंपरेमागची ऐतिहासिक कथा; किती सत्य, किती असत्य?

सुधा मूर्ती यांचं स्पष्टीकरण काय?

“रक्षाबंधनाच्या दिवशी मी शेअर केलेली कथा या सणाशी निगडित अनेक कथांपैकी एक आहे. पण या कथेपासूनच रक्षाबंधनाला सुरुवात झालेली नाही. मी व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटल्याप्रमाणे, ही पूर्वीपासून त्या त्या प्रदेशाची प्रथा होती. माझा उद्देश रक्षाबंधनामागील सुंदर प्रतीकात्मकतेबद्दल, मी मोठी झाल्यावर शिकलेल्या अनेक कथांपैकी एक ठळकपणे मांडण्याचा होता. रक्षाबंधन ही खूप जुनी परंपरा आहे ज्याने आपल्या प्रिय देशाचा काळ आणि संस्कृती पाहिलेली आहे, ज्याचा मला अभिमान आहे”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या.

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. सुधा मुर्ती या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत आहेत. त्यांची संस्थादेखील यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये काम करतेय. सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. त्यासाठी सुरुवातीच्या काळात सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना १०,००० रुपये उधार दिले होते. सुरुवातीच्या काळात मूर्ती दाम्पत्य एका छोट्याशा घरात भाड्याने राहत होते. त्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. आज त्यांची इन्फोसिस ही देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचबरोबर जगभरातल्या नावाजलेल्या आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिसचं नाव घेतलं जातं. इन्फोसिसमध्ये ३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. मूर्ती यांच्या मुलाचीही स्वतःची स्वतंत्र कंपनी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचा इंग्लंडमध्ये मोठा व्यवसाय आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मूर्ती यांचे जावई आहेत.