Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे त्यांच्या कठोर निर्णयामुळे कायम चर्चेत असतात. देशभरातील वेगवेगळ्या प्रकरणांवरील सुनावणीवेळी त्यांनी केलेल्या टिपण्या देखील चर्चेत असतात. आता एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एक महत्वाची टिप्पणी करत वकिलांना फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध खटल्यांवरील सुनावणीदरम्यान वकील अनेकदा पाठिमागच्या काही खटल्यांचा संदर्भ देत असतात. मात्र, यावरूनच सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणावरील सुनावणीवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१ ऑक्टोबर ) एका प्रकरणाची सुनाणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्यासमवेत न्यायालयीन सुनावणी सुरू केली. त्यावेळी एका वकिलाने खान उत्खननाशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख केला. मात्र, या सुनावणीवेळी वकिलांनी अनेकवेळा या प्रकरणाचा उल्लेख करत संदर्भ दिला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Supreme Court on Bulldozer Justice: “मंदिर असो किंवा दर्गा, पाडून टाका…”, अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयासमोरील खान उत्खननाशी संबंधित प्रकरणावरील सुनावणीवेळी वकिलांनी एका प्रकरणाचा दाखला वारंवार दिल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, “सरन्यायाधीश या नात्याने माझ्याकडे जी काही विवेकबुद्धी आहे, ती तुमच्या पक्षात कधीही वापरली जाणार नाही. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल करू शकत नाही. माझी वैयक्तिक विश्वासार्हता पणाला लागली आहे. मला प्रत्येकासाठी मानक नियमांचे पालन करावे लागेल. वारंवार एकच संदर्भ देण्याची ही प्रथा थांबवा. तुम्ही सगळे फक्त संधी घेण्याचा प्रयत्न करत आहात. पण मी ते करणार नाही. कारण माझी वैयक्तिक विश्वासार्हता धोक्यात आली आहे”, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं. दरम्यान, खान उत्खननाशी संबंधित एक प्रकरण कालही खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले होते. मात्र, एकाच प्रकरणात पुन्हा पुन्हा त्याच त्याच एका प्रकरणाचा उल्लेख करण्यावरून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही टिप्पणी करत एकाच प्रकरणाचा अनेकदा उल्लेख न करण्यास सांगितलं.