गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडलेली परखड भूमिका व दिलेले निकाल चर्चेचा विषय राहिले. यात अनेक महत्त्वपूर्ण निकालांचाही समावेश होता. त्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत व दिल्ली-हरियाणा राज्यपाल विरुद्ध सरकार खटल्यांबाबत मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेलं एक विधान घटनात्मक विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरलं आहे. देशाच्या राज्यघटनेतील सध्याच्या तरतुदी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी पुरेशा नसल्याचं ते म्हणाले आहेत. बार अँड बेंचनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुक्त न्यायव्यवस्था म्हणजे अशी न्यायव्यवस्था जी कार्यकारी व कार्यकारी मंडळापासून अलिप्त असेल. ज्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीशही मानवी पक्षपातांपासून मुक्त असतील”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केलं. सर्वोच्च न्यायालयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“मुक्त न्यायव्यवस्थेसाठी तरतुदी आहेत, पण…”

“भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक संस्थात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ न्यायाधीशांच्या निवृत्तीचं निश्चित वय, न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या वेतनात बदल न करण्याचं बंधन. पण न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी या संस्थात्मक तरतुदी अपुऱ्या पडत आहेत”, असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले.

“गेल्या काही काळात यासंदर्भात अनेक वाद उद्भवले आहेत. त्यांचं स्वरूप कमालीचं क्लिष्ट आहे. या वादांचं निराकरण सध्याच्या चौकटीत अवघड होत आहे. पण हे सर्व असलं, तरी सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचं संरक्षण व कायद्याचं राज्य कायम राखण्याचं आपलं मूलभूत कर्तव्य कधीच विसरू शकत नाही”, असंही ते म्हणाले.

न्यायालयांनी आव्हाने ओळखणे आवश्यक! सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धानपनदिनी सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

प्रलंबित खटल्यांबाबतही मांडली भूमिका

दरम्यान, यावेळी बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायपालिकांसमोर प्रलंबित असणाऱ्या खटल्यांबाबतही भाष्य केलं. “सातत्याने वाढत्या खटल्यांवर तोडगा काढण्यात वर्षागणिक सर्वोच्च न्यायालयाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजघडीला फक्त सर्वोच्च न्यायालयासमोर ६५ हजार ९१५ खटले प्रलंबित आहेत. या वाढत्या खटल्यांचा अर्थ नागरिकांचा न्यायपालिकेवर विश्वास दृढ होत असल्याचं सांगून आपण स्वत:ची समजूत काढतो. पण यावर आपल्याला कठीण मुद्द्याला हात घालावाच लागेल. या वाढत्या खटल्यांवर काय करता येईल? निर्णयप्रक्रियेकडे बघण्याच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. प्रत्येक खटल्यामध्ये न्याय झालाच पाहिजे या आपल्या इच्छेपोटी आपण न्यायालये अकार्यक्षम बनण्याची जोखीम घ्यायला हवी का?” असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court cji dhananjay chandrachud speaks on independent judiciary pmw
Show comments