Surinder Choudhary: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कारण नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. आता नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज (१६ ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्याबरोबर चार आमदारांनीही मंत्रि‍पदाची शपध घेतली आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आमदार सुरिंदर चौधरी यांनी शपध घेतली आहे. सुरिंदर चौधरी हे नौशेरा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत. सुरिंदर चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांचा पराभव केला होता. मागील वर्षी जुलैमध्ये सुरिंदर चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता. त्याआधी ते पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीत(पीडीपी) होते. त्यानंतर पीडीपीमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आधी नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा : “मला गोदारनं फोन करून मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिली”, मारेकऱ्यानं चौकशीत केलं कबूल; यूकेमध्ये रचला हत्येचा कट!

ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये सुरिंदर चौधरी यांची थेट उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे सुरिंदर चौधरी कोण आहेत? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे रविंद्र रैना आणि सुरिंदर चौधरी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीवेळी सुरिंदर चौधरी हे मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र रैना आणि सुरिंदर चौधरी यांच्याच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर या निवडणुकीत भाजपाचे रवींद्र रैना यांचा ७ हजार ८१९ मतांनी सुरिंदर चौधरी यांनी पराभव केला.

कोणत्या पाच कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली?

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ओमर अब्दुल्ला यांनी आज घेतली. ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुरिंदर चौधरी यांनी घेतली. तसेच च्यांच्याबरोबर चार आमदारांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये सतीश शर्मा, जावेद दार, सकीना येतू आणि जावेद राणा यांचा समावेश आहे. यामध्ये जावेद राणा हे मेंढर येथून आमदार झाले आहेत. ते याआदी २००२ आणि २०१४ मध्ये आमदार झाले होते.

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कारण नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. आता काँग्रेसने आघाडी केलेला पक्षाच सरकार आलं असलं तरी प्रत्येक्षात काँग्रेस या सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचा एकही आमदार मंत्री होणार नाही. पण या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे.