स्वाईन फ्लूमुळे डिसेंबरपासून भारतात १५०० लोक मृत्युमुखी पडले असताना, अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनानुसार हा आजार पसरविणाऱया एच१एन१ विषाणूच्या स्वरुपामध्ये बदल होत असून, त्यामुळे तो अधिक घातक बनला आहे.
यापूर्वी भारतात यासंदर्भात झालेल्या संशोधनामध्ये या विषाणूच्या स्वरुपात कोणताही बदल झालेला नसल्याचे म्हटले होते. २००९ मध्ये पहिल्यांदा या विषाणूमुळे भारतात लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळचा एच१एन१ विषाणू आणि आताचा विषाणू यांच्या स्वरुपामध्ये फरक झाला असल्याचे एमआयटीमध्ये झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. विषाणूमध्ये झालेला बदल अधिक घातक असून, त्यामुळे या आजाराचा धोका आणखी वाढला आहे, असे एमआयटीतील संशोधकांनी म्हटले आहे. विषाणूतील बदलामुळे त्याची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या श्वसनयंत्रणेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.