पीटीआय, मनचेरियल (तेलंगण)
‘‘काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) सामील होऊ, अशी मतदारांना ग्वाही देऊन असे सांगून मते मागत असल्याचा दावा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी केला. येथील कोळसा खाण परिसरात निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
राव यांनी आरोप केला, की पूर्वीच्या काँग्रेस राज्यकर्त्यांच्या अपयशामुळे राज्य सरकारला ‘एसएससीएल’मधील ४९ टक्के हिस्सा विकावा लागला. काँग्रेसच्या मंडळींना आपला पराभव निश्चित असल्याची खात्री पटल्याने त्यांनी नवाच प्रचार सुरू केला आहे. निवडून आल्यास आम्ही ‘बीआरएस’मध्ये सामील होऊ, असे आश्वासन ते आता मतदारांना देत आहेत असा दावा केसीआर यांनी केला.
हेही वाचा >>>संजय राऊतांच्या हिटलर संदर्भातील पोस्टचा इस्रायलकडून कठोर शब्दांत निषेध; या प्रकरणी राऊतांची प्रतिक्रिया…
भाजपवर टीका करताना राव म्हणाले, की भाजप सत्ताधारी असलेल्या केंद्र सरकारने तेलंगणाला एकही वैद्यकीय महाविद्यालय किंवा नवोदय शाळा दिली नाही. या पक्षाला तेलंगणवासीय मते का देतील? भाजपला मतदान करणे म्हणजे मते नाल्याच्या पाण्यात वाहून वाया जाण्यासारखे आहे. काँग्रेसनेच १९५६ मध्ये तेलंगणचे आंध्र प्रदेशात विलीनीकरण केले, परिणामी तेलंगणला ५० वर्षे त्रास सहन करावा लागला. आश्वासन दिल्यानंतरही काँग्रेसने तेलंगणची स्वतंत्र स्थापना करण्यात विलंब केला. यावेळी राव यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीचा तपशील सांगून, ‘बीआरएस’च्या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन केले.
तेलंगणच्या ‘सिंगरेनी कॉलियरीज कंपनी लिमिटेड’ऐवजी (एससीसीएल) ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाच्या कोळसा खाणीतून कोळसा आयात केला जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असल्याचा आरोपही राव यांनी केला.