पाकिस्तान सीमेजवळील पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्य़ात सैनिकांच्या वेषात आलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे दीनानगर पोलीस ठाण्यासह एका बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह आठ जणांचा मृत्यू झाला. सुमारे १२ तासांच्या या थरारक मोहिमेत सुरक्षा दलांनी प्रतिहल्ला चढवून तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले. स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असताना झालेल्या या हल्ल्यानंतर विशेषत: पंजाब व जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
या हल्ल्याची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) अलीकडेच जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यांसारखीच असल्यामुळे संशयाची सुई पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (एलईटी) किंवा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या संघटनांकडे वळली आहे. अमृतसर- पठाणकोट रेल्वेमार्गावर पाच जिवंत बॉम्ब सापडल्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले.
दहशतवादी हल्लेखोरांच्या ओळखीबाबत अद्याप अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि, ते जम्मू व पठाणकोट किंवा जम्मू जिल्ह्य़ातील चाक हिरा दरम्यानच्या कुंपणरहित सीमेवरून भारतात शिरले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी तीन नागरिक, तसेच पंजाब प्रांतीय सेवेचे अधिकारी असलेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग, दोन गृहरक्षक आणि दोन पोलिसांना ठार मारले. हल्ल्यात १५ लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
पहाटे पाच वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी एका छोटय़ा उपाहारगृहाला लक्ष्य केले आणि मारुती-८०० मोटारीत बसून जाताना दीनानगरजवळील एका विक्रेत्याला गोळी घालून ठार मारले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा