काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेसने आपल्या देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. काँग्रेस आपल्याला शासक मानत आला आहे आणि जनतेला छोटं समजत आले आहेत. त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या जनतेला कमी लेखलं होतं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसचा विश्वास फक्त एका कुटुंबावरच राहिला आहे. त्या घराणेशाहीत काँग्रेस पक्ष गुरफटला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच थँक्यू अधीर रंजनजी म्हणत त्यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

आम्ही घराणेशाही हे जेव्हा म्हणतो, तेव्हा जो पक्ष कुटुंब चालवतो आणि आपल्याच पक्षातल्या लोकांना प्राधान्य देतो त्याचा आम्ही विरोध करतो. एकच घराणं सगळे निर्णय घेतं त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. लोकशाहीत हे योग्य नाही. राजकारणात एका कुटुंबातले दहा लोक आले तरीही काहीच प्रश्न नाही. पण ते त्यांच्या प्रतिभेवर आणि लोकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले हवेत, लादलेले नकोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींनी सांगितली घराणेशाहीची व्याख्या

कुटुंब किंवा विशिष्ट घराणंच जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा घराणेशाहीचा प्रश्न आहे. आम्हालाही वाटतं की या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे. घराणेशाहीचं राजकारण हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे. एखाद्या कुटुंबातले दोन काय दहा लोक प्रगती करत असतील तर मी स्वागत करेन. प्रश्न हा आहे की घराणंच जिथे पक्ष चालवतात ते लोकशाहीसाठी हे संकट आहे. एक पक्ष त्याचा काँग्रेस एका कुटुंबातच गुरफटून गेलेला पक्ष आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. तसंच अधीर रंजन चौधरी यांचे आभार मानले आणि हा मुद्दा मला बोलता आला त्यामुळे तुम्ही हा विषय काढलात बरं झालं असंही मोदी त्यांना उद्देशून म्हणाले.

हे पण वाचा- “घराणेशाहीमुळे काँग्रेसच्या दुकानाला कुलुप लागायची वेळ, एकच प्रॉडक्ट वारंवार…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

निवडणुकीचं वर्ष होतं काहीतरी नवं घेऊन समोर यायचं. आज विरोधी पक्षाची जी अवस्था झाली आहे ना त्याला सर्वाधिक कोण जबाबदार असेल तर काँग्रेस. काँग्रेसला दहा वर्षात विरोधी पक्ष म्हणूनही मोठं होता आलं नाही. विरोधात इतरही तेजस्वी लोक आहेत. मात्र त्यांची उमेद घालवण्याचंही कामही काँग्रेसने केलं. तरुण पिढीला पुढे जाऊ दिलं नाही. काँग्रेसने विरोधी पक्षाचं, स्वतःचं, संसदेचं आणि देशाचं खूप मोठं नुकसान केलं. देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. देशाने घराणेशाहीची खूप मोठी किंमत मोजली, काँग्रेसलाही ती किंमत मोजावी लागली, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thank you adhir ranjanji said pm narendra modi also explained the definition of dynastic politics scj