देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे रूग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. भारताकडून अन्य देशांना लस निर्यात होत असताना, महाराष्ट्रासह काही राज्य लसींचा पुरवठा वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
केंद्र सरकार की फ़ेल नीतियों से देश में कोरोना की भयानक दूसरी लहर है और प्रवासी मज़दूर दोबारा पलायन को मजबूर हैं।
टीकाकरण बढ़ाने के साथ ही इनके हाथ में रुपय देना आवश्यक है- आम जन के जीवन व देश की अर्थव्यवस्था दोनों के लिए।
लेकिन अहंकारी सरकार को अच्छे सुझावों से ऐलर्जी है!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 10, 2021
तसेच, “आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात.” अशी मागणी देखील या अगोदर राहुल गांधी यांनी केलेली आहे.
लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र
“वाढत्या करोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधी म्हणाले होते.
११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!
करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.