महाराष्ट्रातील शिवसेनेच्या खासदारांना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी महाराष्ट्र सदनात ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेचे १३ खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
परराज्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या सत्यपालसिंह यांना महाराष्ट्र सदनात कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला देण्यात येणारी खोली देण्यात आली असून, शिवसेनेच्या खासदारांना साध्या खोल्या देण्यात आल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील माणसांवर महाराष्ट्र सदनात होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ठिय्या आंदोलन हा आमच्या भावनांचा उद्रेक आहे. महाराष्ट्रातील लोकांवरच इथे अन्याय होणार असेल, तर या सदनाचे नाव बदला, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सोमवारपर्यंत आपली बाजू स्पष्ट करावी, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा राऊत यांनी दिला.