पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला गेला असून तो पूर्णपणे अविचारी आहे. काहीही विचार न करत नरेंद्र मोदी हे देशाची चेष्टा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला. ते शनिवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कपिल सिब्बल यांनी नोटा रद्द करण्याचा निर्णयावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या देशभरात ‘बँक मे कतार है, आम आदमी लाचार है और मोदी जिम्मेदार है’ अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत मोदींनी देशात असायला हवे होते. मात्र, ते जपानला जाऊन बसले आहेत, असा टोला सिब्बल यांनी लगावला.
मोदी सरकारने काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शंभर रूपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशभरातील बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. यावरूनही कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे. बँकेतील खाते माझे आहे, पैसे माझे आहेत मग मी रांगेत उभे का राहावे?, असा सवाल यावेळी सिब्बल यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीत ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहिले होते. राहुल गांधी यांना पाहताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर राहुल गांधीदेखील सामान्य माणसांसोबत रांगेत उभे राहिले. यानंतर आसपासच्या लोकांनी राहुल गांधीसोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली. ‘तुम्हाला याठिकाणी कोणी सूटाबुटातील व्यक्ती दिसते आहे का ?’, असा प्रश्न यावेळी राहुल गांधी यांना लोकांना विचारला. ‘सामान्य माणूस त्रासलेला आहे. मात्र यामुळे मोदींना कोणताही फरक पडत नाही,’ अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. ‘माझ्या लोकांना त्रास होतो आहे. मी त्यांच्यासोबत उभा राहण्यासाठी आलो आहे,’ असे यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. ‘सरकार सामान्य माणसांसाठी असायला हवे. फक्त १० ते १५ मूठभर लोकांसाठी असता कामा नये,’ असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.