पीटीआय, रुद्रप्रयाग

जिल्ह्यातील केदारनाथ धाम मार्गावर रविवारी झालेल्या भूस्खलनात महाराष्ट्रातील दोघांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय आठ जण जखमी झाले. नागपूरचे किशोर अरुण पराते (वय ३१) आणि जालना जिल्ह्यातील सुनील महादेव काळे ( वय २४) आणि अशी राज्यातील दोन मृतांची नावे आहेत. त्याशिवाय रुद्रप्रयागमधील अनुराग बिष्ट या तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, गौरीकुंड-केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता भूस्खलन झाले. भाविकांवर डोंगरावरून खाली पडणारे मोठे दगड आणि ढिगारे कोसळले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध व बचावकार्य सुरू केले असे त्यांनी सांगितले.