तिरुपती : तिरुमाला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील ‘लाडू प्रसादम्’ची गुणवत्ता वाढल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केल्याचा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी केला. तिरुमाला येथील ‘तिरुमाला तिरुपती देवस्थानम्’द्वारे (टीटीडी) स्थापन केलेल्या ‘वकुलमथा’ या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

नायडू म्हणाले की, प्रसादाचे लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबरोबरच ‘टीटीडी’ गरज भासल्यास ‘आयआयटी’चा सल्लाही घेऊ शकते. यापूर्वीच्या ‘वायएसआर काँग्रेस’च्या राजवटीत प्रसादममध्ये भेसळयुक्त तूप वापरण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री नायडू आणि ‘टीटीडी’चे कार्यकारी अधिकारी यांनी केला होता.

हेही वाचा >>> Jammu-Kashmir Assembly Election 2024 Exit Poll : अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलचे आकडे आले समोर

नायडू म्हणाले की, अनेक भाविकांनी लाडूच्या गुणवत्तेबद्दल समाधानी असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. लाडूच्या गुणवत्तेवर भाविकांनी असंतोष व्यक्त केल्याच्या अनेक घटना यापूर्वीच्या सरकारच्या काळात घडल्या. या मुद्द्याकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु आज आम्ही भाविकांकडून अभिप्राय घेत आहोत, असे नायडू यांनी सांगितले. अलीकडेच नायडू यांनी वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे संरक्षक ‘टीटीडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. प्रसाद बनवताना केवळ उत्तम दर्जाचे घटकच वापरले जातात का, याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी मंदिर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

सध्याचे सरकार कोणतीही भेसळ सहन करणार नाही. भगवान बालाजीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी ‘टीटीडी’ वचनबद्ध आहे. ‘टीटीडी’ आणि सरकारही भगवान बालाजी किंवा श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या पवित्रतेचे आणि पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी येथे आहे. हीच आमची बांधिलकी आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू. – एन. चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश