Toll Price : नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या किंमती करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच सरकारतर्फे नवं टोल धोरण आणलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

लवकरच येणार नवं टोल धोरण

केंद्र सरकार लवकरच नवं टोल धोरण ( Toll Price ) आणण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर टोलचे परवडणारे दर लागू होतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. नव्या टोल धोरणानुसार ३ हजार रुपये वार्षिक तर ३० हजार रुपये १५ वर्षांसाठी अशा प्रकारे दर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी एकदाच पेमेंट करावं लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर हे टोल नव्या दरात येतील. सामान्यांच्या खिशाला परवडतील असे टोल आणण्याची तयारी केंद्राकडून केली जाते आहे.

राज्यसभेत बोलत असताना दिली महत्त्वाची माहिती

राज्यसभेत नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देत असताना टोलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी केंद्र सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. सध्याच्या घडीला रस्ते निर्मितीवर सरकार भरपूर खर्च करतं आहे. त्यामुळे टोल टॅक्स हा आवश्यक भाग आहे. मात्र लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा, महामार्गांचा वापर करतात त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठीही आम्ही या धोरणात विचार करणार आहोत. भारतात टोल टॅक्सचं कलेक्शन हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६४, ८०९.८६ कोटी रुपयांपर्यंत पोहचलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कलेक्शन ३५ टक्क्यांनी वाढलं आहे अशीही माहिती नितीन गडकरींनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

टोल प्लाझाही काढले जाणार

राष्ट्रीय महामार्गांवर असलेले टोल प्लाझाही काढले जाणार आहेत. त्याऐवजी सॅटेलाइटवर आधारित बॅरियर फ्री टोल व्यवस्था नव्या धोरणानुसार लागू केली जाईल. यामुळे टोल नाक्यांवर, प्लाझांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा टाळता येतील. तसंच भविष्यात या प्रणालीचा देशभरात टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. सॅटेलाइट टोल प्रणालीमुळे बँकेच्या खात्यातून आपोआप टोल कापला जाईल. सध्याच्या घडीला आम्ही चोरयासी, द्वारका एक्स्प्रेस वे अशा ठिकाणी अॅडव्हानस टोल व्यवस्थाही लागू केली आहे. या ठिकाणी सध्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना न थांबता त्यांचा टोल भरता येतो आहे.

टोलसंबंधीची माहिती आम्ही वेबसाइटवर केली पोस्ट

राष्ट्रीय महामार्गांवर जे टोल घेतले जातात त्याची माहितीही आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर पोस्ट केली आहे. देशात ३२५ राष्ट्रीय महामार्ग आहेत ज्या ठिकाणी आम्ही अॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लागू केली आहे. त्यामध्ये २० हजार किमीचे रस्ते कव्हर होत आहेत.